नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) कालपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेचा सगळ्यात मोठा मुकाबला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला होणार आहे. या हाय व्होल्टेज मॅचआधी जम्मू -काश्मीरमध्ये सातत्याने होणारे दहशतवादी हल्ले पाहता, टीम इंडियाचा पाकिस्तानसोबत होणारी मॅच रद्द करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणताही सामना होऊ नये, असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, पंजाब सरकारमधील मंत्री परगट सिंह यांनीही हीच मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर ट्विटरवर #BoycottPakistan हा हॅशटॅग ट्रेंड वर आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सीमेवर अनेकदा चकमकी उडत आहेत. दहशतवाद्यांकडून जम्म-काश्मीरमधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.
हे वाचा- T20 World Cup: भारत-पाकिस्तान मॅचपूर्वी का ट्रेंड होतय #BoycottPakistan?
दरम्यान, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर मोठे विधान केले आहे. ''पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये काहीच सुधारणा होत नसेल. त्यांच्या कुरापती अशाच सुरू असतील तर भारत-पाक क्रिकेट सामना रद्द करण्याबाबतचा याचा विचार करायला हवा, असं गिरीराज सिंह म्हणाले आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादाचा मुखवटा संपूर्ण जगासमोर उघड झाला आहे आणि याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील'', असेही ते म्हणाले.
तर दुसरीकडे, पंजाब सरकारमधील मंत्री परगट सिंग यांनीही भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत-पाक सामना रद्द केला गेला पाहिजे कारण सीमेवरील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ होणार नाही याचा काळजी घेत सामना रद्द करण्याची गरज आहे, असं कॅबिनेट मंत्री परगट सिंग म्हणाले.
घाटीमध्ये दहशतवाद्यांकडून नागरिकांना लक्ष्य करण्यावर लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी रविवारी सांगितले की, आम्ही निरपराध नागरिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ. तसेच, जम्मू-काश्मीरची शांतता आणि सामाजिक-आर्थिक प्रगती आणि लोकांच्या वैयक्तिक विकासास बाधा आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही सिन्हा यांनी यावेळी केला.
हे वाचा- पुलवामा चकमकीत दोन दहशतवादी ठार, लष्कर-ए-तैयब्बाचा म्होरक्या झाला ढेर
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 मॅच झाल्या, यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. 2007 साली ग्रुप स्टेज आणि फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला.
यानंतर 2012, 2014 आणि 2016 सालीही टीम इंडियाला विजय मिळाला. 2016 साली भारत-पाकिस्तान यांच्यात अखेरचा टी-20 वर्ल्ड कपचा सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 5 विकेट गमावून 118 रन केले होते, भारताने हा सामना 4 विकेट गमावून जिंकला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, India vs Pakistan, Jammu and kashmir, T20 cricket, T20 world cup, Terror acttack