मुंबई, 30 मार्च : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यंदा पुन्हा एकदा पहिले आयपीएल विजेतेपद मिळवण्याच्या निर्धारानं या स्पर्धेत उतरणार आहे. आरसीबीची पहिली मॅच 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी आरसीबीचे खेळाडू ट्रेनिंगसाठी आता चेन्नईत दाखल झाले आहेत. आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा दोन दिवसांनी म्हणजेच 1 एप्रिल रोजी चेन्नईत दाखल होणार आहे. भारत-इंग्लंड मालिका संपल्यानंतर विराट कोहलीनं बायोबबल सोडले आहे. त्यामुळे विराटला आयपीएलपूर्वी आठवडाभर क्वारंटाईन राहवे लागेल.
बीसीसीआयने आयपीएल 2021 साठी बनवलेल्या नियमावलीनुसार भारत-इंग्लंड मालिकेत सहभागी झालेल्या खेळाडूंना सोडून अन्य सपोर्ट स्टाफ, खेळाडू आणि आयपीएल फ्रँचायझीशी संबंधित सर्व सदस्यांना बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सात दिवस हॉटेलमधील रुममध्ये क्वारंटाईन राहवे लागेल.
या कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीची अनेकदा कोरोना चाचणी करण्यात येईल. तो रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतरच खेळाडूंना हॉटेलच्या बाहेर येऊन आऊटडोअर ट्रेनिंग करता येईल. युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज हे टीम इंडियातील खेळाडू सोमवारी चेन्नईत दाखल झाले आहेत. हे दोघेही टीम इंडियातील बायो-बबलमधून थेट चेन्नईत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन राहवे लागणार नाही. ते थेट ट्रेनिंग सुरु करु शकतात.
(हे वाचा-रोड सेफ्टी सीरिजमध्ये खेळलेल्या चौथ्या भारतीय खेळाडूला कोरोना झाल्यामुळे खळबळ)
आरसीबीचे अन्य खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मागच्या आठवड्यात चेन्नईला दाखल झाला आहे. यामध्ये टीमचे संचालक माईक हेसन, सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर आणि फास्ट बॉलर नवदीप सैनीचा समावेश आहे. तर एबी डिव्हिलियर्स देखील दोन दिवसांपूर्वी चेन्नईत दाखल झाला आहे. मागच्या आयपीएलमध्ये आरसीबीची टीम चौथ्या क्रमांकावर होती.
विराटनं व्यक्त केली होती नाराजी
यापूर्वी, भारत-इंग्लंड मालिका संपल्यानंतर विराट कोहलीने भारतीय टीमच्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये वेळापत्रक तयार करताना विचार करायला हवा. बायो बबल्समध्ये खेळणं ही अवघड गोष्ट आहे. प्रत्येकामध्ये ती मानसिक क्षमता असेलच असे नाही. या गोष्टीचा भविष्यात विचार होईल अशी मला खात्री आहे,' असं मत वन-डे मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर विराटनं व्यक्त केलं.
भारतीय खेळाडूंनी गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेनंतर सातत्याने क्रिकेट खेळले आहे. आयपीएल स्पर्धा (IPL 2020) नोव्हेंबरमध्ये संपली. त्यानंतर लगेच भारतीय टीम ऑस्ट्रेलियात भरगच्च क्रिकेट दौऱ्यावर गेली होती. त्यानंतर घरच्या मैदानावर टीम इंडियानं इंग्लंडचा सामना केला. आता लगेच पुन्हा आयपीएल स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना सज्ज व्हायचं आहे.
(हे वाचा : IPL 2021 : आयपीएलवर संकट, भारत-इंग्लंड सीरिजमधल्या भारतीय कॉमेंटेटरला कोरोना )
भारताने आयपीएल स्पर्धेनंतर आठ टेस्ट, सहा वन-डे आणि आठ टी-20 मॅच खेळल्या आहेत. या सततच्या क्रिकेटवरच विराटनं नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid-19, Home quarantine, IPL 2020, IPL 2021, Mumbai Indians, RCB, Virat kohli