मुंबई, 24 मे : आयपीएल 2022 नंतर लगेच भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी 18 सदस्यांची टीम इंडिया जाहीर झाली आहे. या टीममध्ये अनेकांनी पुनरागमन केलं असून यामध्ये दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) देखील समावेश आहे. आयपीएल स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर कार्तिकनं 3 वर्षांनी टीम इंडियात जागा मिळवली आहे.
दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय टीमवर सुरेश रैनानं (Suresh Raina) नाराजी व्यक्त केली आहे. या टीममध्ये शिखर धवनचा (Shikhar Dhwan) समावेश करण्यात न आल्यानं रैना नाराज झाला आहे. धवननं या आयपीएल सिझनमध्ये 14 सामन्यात 38 च्या सरासरीनं 460 रन केले. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट 122 होता. आपण आणखी 3 वर्ष खेळू शकतो असं त्यानं नुकतंच जाहीर केलं आहे, त्यानंतरही निवड समितीनं धवनकडं दुर्लक्ष केलंय.
या विषयावर 'स्टार स्पोर्ट्स' शी बोलताना रैना म्हणाला की, 'शिखर धवन खूप निराश झाला असेल. त्याच्यासारख्या खेळाडूची कोणत्याही कॅप्टनला गरज आहे. तो आनंदी खेळाडू असून त्याच्यामुळे टीममधील वातावरण हे चांगले राहते. धवननं देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि टी20 या सर्व प्रकारात रन केले आहेत. त्यानं गेल्या तीन वर्षांपासून सातत्यानं रन केले आहेत. तुम्ही दिनेश कार्तिकचा टीममध्ये समावेश केला आहे, तर धवनचाही नक्कीच हक्क होता. या निर्णयामुळे तो निराश झाला असेल.
IPL मध्ये असतो तर... टीम इंडियात परतल्यानंतर चेतेश्वर पुजारानं मांडली व्यथा
शिखर धवननं श्रीलंका विरूद्ध 2021 साली शेवटचा टी20 इंटरनॅशनल सामना खेळला होता. त्यानंतर त्याला पुन्हा या प्रकरात संधी देण्यात आलेली नाही. तो मागच्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमधूनही बाहेर होता. भारत - दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी निवड समितीनं केएल राहुलसोबत ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन या ओपनर्सना संधी दिली आहे. ऋतुराजनं या आयपीएल सिझनमध्ये 368 तर इशान किशननं 418 रन केले आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त रन करूनही निवड समितीनं धवनचा विचार केलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Shikhar dhawan, Suresh raina, Team india