बारामती, 2 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यातील बारामतीत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्र्सच्या माध्यमातून कृषी महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर आणि विज्ञान संशोधन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) हस्ते पार पडले. या कार्यक्रमात राष्ट्पवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली. (Inauguration of incubation and innovation center in baramti)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, बारामतीत येण्याची ही दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे पवार साहेब हे महाराष्ट्राचं आणि इतर संस्थांचं करत आहेत. संपूर्ण पवार कुटुंब हे विकासाच्या ध्यासात मग्न आहेत. राजकारणात टीकाकार असतात आणि असलेच पाहिजेत. पण टीका करत असताना... आपल्याला सर्वांना माहिती आहे शिवसेनाप्रमुख आणि पवारसाहेबांची मैत्री. बाळासाहेब मला सांगायचे अरे बारामतीत जाऊन ते शरद पवार जे करत आहेत ते पहायला हवं. ही एक वृत्ती असते ना... ठीक आहे राजकारणात आपलं एक मत होत नाही. पण राजकारणात पटत नाही म्हणून तुम्ही चांगले काम करत आहात त्यात अडथळे आणणं ही आपलं राजकारण, संस्कृती असू शकत नाही. अगदी पाठींबा जरी देता येत नसेल तरी त्यात विघ्न तरी आणू नयेत. विघ्नसंतोषी खूप आहेत. पण त्यांना मिळत काय?
युतीवरुन मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
बदल घडत असतो, जिद्द पाहिजे. राजकारणात इनक्युबेशन सेंटर उघडलं होत, मराठीत उबावनी केंद्र म्हणतात. आम्ही सुद्धा 25 वर्षे नको ती अंडी उबवली पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात. अशाही काही गोष्टी घडत असतात. ठीक आहे आपण आपलं काम केलं. पुढे काय करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
"फटाक्यांचा आवाज येऊ द्या, नुसता धूर काढू नका"
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मगाशी गाडूतून येताना अजितदादा सांगत होते पुण्यानंतर बारामती दुसरं केंद्र बनेल शिक्षणाचं.... राजकारणाचं तर आहेच. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इते शिकवल्या जातात. आपण मिळून धडा शिकवण्याचं काम करू. चांगल्या कामाच्या आड येणार नाही. जे जे चांगलं काम आहे ते आपण करणारच आहोत.
दिवाळी सुरू झालीच आहे. काहीजण म्हणत आहेत फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे आवाज येऊ द्यात पण धूर काढू नका. धूर काढू नका एवढ्यासाठी कारण कोरोना अद्याप गेलेला नाहीये असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
काय म्हटले होते देवेंद्र फडणवीस?
1 ऑक्टोबर रोजी नवाब मलिक यांच्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर दिलं होतं. दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजून खूप आवाज झाल्याचा आव मलिक आणतात असं फडणवीस म्हणाले होते. तसेच दिवाळीनंतर मी बॅाम्ब फोडेल. मी काचेच्या घरात राहत नाही. त्यांनी सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baramati, Pune, Uddhav thackeray