जितेंद्र जाधव, (इंदापूर) 22 फेब्रुवारी : इंदापूर तालुक्यात अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदापूर जंक्शन येथे आज (दि.22) सकाळी पावणे सहाच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले आहे. यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान ही घटना आज वालचंद नगर पोलीस स्टेशन समोरच घडली आहे. इंदापूर जंक्शन परिसरात झालेल्या अपघाताने नागरिक हळहळ व्यक्त करत होते.
बारामती इंदापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाने या दोन महिलांना चिरडले आहे. यामध्ये अनिता शिवाजी शिंदे आणि अर्चना श्रीशैल्य सनमत असे त्यांची नावे आहेत. या महिला इंदापूर जंक्शन परिसरात राहतात.
हे ही वाचा : लैंगिक अत्याचारातील आरोपी मोकाट; पीडित महिलेने पोलिसांसमोरच..; बुलढाण्यात खळबळ
दरम्यान याभागात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळेच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील दोन दिवसांपूर्वीच अंथुर्णे येथे एका 36 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. ही तीन दिवसातील दुसरी घटना असून तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जंक्शन गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून या भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एकाच वेळी दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्देवी घटना बारामती इंदापूर रस्त्यावर जंक्शन येथे घडली आहे.
हे ही वाचा : आधी आरोपीचं लग्न मग मृतदेहाची विल्हेवाट.. निक्कीच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासे
अपघातात दोन्ही महिलांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर मार लागल्याने दोघींचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळाली. त्यांनी तातडीने पोलिसांना (Police) याबाबत कळवले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.