मुंबई, 2 मे : राजकारण हे बुद्धीबळाच्या डावाप्रमाणे असतं असं म्हटलं जातं. समोरचा कोणता डाव खेळणार याचा विचार करून आपली चाल ठरवावी लागते. राजकारणाच्या याखेळात शरद पवार (Sharad Pawar) यांचा अनुभव अत्यंत तगडा आहे. त्यामुळंच राज्याच्याच नव्हे देशाच्या राजकारणातही (Politics) काही हालचाली झाल्या तरी त्यामागं शरद पवारांचा हात तर नाही अशी चर्चा सुरू होते. आता पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतरही (West Bengal Election) तशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनीच या चर्चेची सुरुवात केल्याचं राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटलं आहे. (वाचा- ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर शरद पवारांचा भाजपवर निशाणा ) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी गौप्यस्फोट केल्याचं म्हटलंय. शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडलं. त्यामुळं मतविभागणी रोखली गेली. याचा फटका भाजपला बसला त्यामुळं पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला असं वक्तव्य कैलास विजयवर्गीय यांनी केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. विजय वर्गीय यांच्या या वक्तव्याचा अर्थ शरद पवारांचा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अदृश्य हात होता असंही आव्हाड यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
प.बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट..!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 2, 2021
“शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.”
.याचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता..! pic.twitter.com/ofboPWAzlz
(वाचा- Pandharpur मध्ये भाजपने केली खास व्यूहरचना, राष्ट्रवादीचा असा केला ‘कार्यक्रम’ ) पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना शरद पवारांनी पाठिंबा दर्शवला होता. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींच्या प्रचारासाठी शरद पवार हे पश्चिम बंगालमध्ये जाणारही होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांना प्रचाराचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. ममता बॅनर्जींनी भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. शरद पवारांनी त्याला सक्रिय प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता शरद पवारांनी ममता दीदींच्या विजयावर त्यांचं अभिनंदनही केलं. तसंच निकालानंतरच्या घडामोडींवर पवारांनी टीकाही केली.
Congratulations @MamataOfficial on your stupendous victory!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
Let us continue our work towards the welfare of people and tackling the Pandemic collectively.
रडीचा डाव!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!
एकूणच जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटनंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर यावरुन एक नवा सामना रंगणार असं दिसत आहे. कारण पश्चिम बंगालची निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत विजयासाठी भाजपनं जंग जंग पछाडलं होतं. पण आता पराभवानं भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यात हा नवा मुद्दा समोर आल्यानंतर पुन्हा भाजप पवारांवर टीका करू शकतं.