नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: गुरुग्राममध्ये रेल्वे ट्रॅकवर (Selfie near Railway Track) सेल्फी काढणाऱ्या चार तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या शिवाय पश्चिम बंगालमधील मिदनापूर (Midnapore, West Bengal) येथे कोसी नदीच्या रेल्वे पुलावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात दोन तरुणांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या घटना रेल्वे मंत्रालयासाठी (Ministry of Railways) चिंतेची बाब ठरत आहेत. रेल्वे संघटनांसुद्धा रेल्वे बोर्डाला (Railway Board) पत्र लिहून याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करणार आहेत. जेणेकरून सेल्फी काढणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि अशा अपघातांना आळा बसेल. प्रत्यक्षात, रेल्वे अॅक्ट, 1989 नुसार (Railways Act, 1989), ट्रॅकवर किंवा त्याच्या बाजूला फोटो किंवा सेल्फी काढणं हा गुन्हा आहे. याबाबत सविस्तर माहिती काय आहे, कायदा मोडल्यास किती शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे, हे आपण जाणून घेऊया.
रेल्वे ट्रॅक किंवा त्याच्या बाजूला सेल्फी घेणं, हा रेल्वे अॅक्ट 1989मधील कलम 145 आणि 147 अंतर्गत दंडात्मक गुन्हा (Punitive offense) ठरवण्यात आला आहे. असं केल्यास 1000 रुपये दंड किंवा सहा महिने कारावासही होऊ शकतो. कायद्यातील कलम 145मध्ये असं सांगण्यात आलं आहे की, एखाद्या व्यक्तीनं जाणूनबुजून किंवा कोणत्याही कारणाशिवाय रेल्वे प्रशासनाद्वारे प्रदान केलेल्या कोणत्याही सुविधांमध्ये अडथळा आणल्यास आणि त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम झाल्यास तिच्यावर रेल्वे कर्मचारी कारवाई करू शकतात. संबंधित व्यक्तीचा पास किंवा रेल्वे तिकीट जप्त होऊ शकतो. याशिवाय तिला सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षाही होऊ शकते.
हे वाचा-तिरुपती मंदिराला केसांच्या विक्रीतून 126 कोटी, लाडू प्रसादातून 365 कोटींची कमाई
रेल्वे अॅक्ट, 1989मधील कलम 147मधील (अतिक्रमण आणि अतिक्रमणापासून दूर राहण्यास नकार) तरतुदीनुसार, जर एखादी व्यक्ती कायदेशीर अधिकाराशिवाय कोणत्याही रेल्वेमध्ये किंवा रेल्वेच्या कोणत्याही भागामध्ये प्रवेश करून मालमत्तेचा गैरवापर करत असेल आणि तिथून बाहेर पडण्यास नकार देत असेल तर त्याला सहा महिन्यांच्या कारावासाची किंवा एक हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची (Penalty) शिक्षा होऊ शकते.
अशाप्रकारे, परवानगीशिवाय रेल्वेच्या कोणत्याही मालमत्तेत प्रवेश केल्यास आणि रेल्वेच्या कामकाजात अडथळा आणल्यास रेल्वे कायद्यानुसार शिक्षेची आणि दंडाची तरतूद अगोदरच करण्यात आलेली आहे. या आधारवरच काल (17 फेब्रुवारी 2022) रेल्वे सुरक्षा दलानं दिल्लीतील शकूरबस्ती (Delhi, Shakurbasti) येथे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम सुरू केली आहे. यामध्ये आतापर्यंत शंभरहून अधिक जणांवर कारवाई करून त्यांना चालान देण्यात आलं.
नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन (NFIR) या रेल्वे संघटनेचे प्रवक्ते एसएन मलिक म्हणतात की, सरकारनं बुलेट ट्रेनवर पैसे खर्च करण्याऐवजी भारतीय रेल्वेच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शहरी, लोकवस्तीच्या भागात रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंती किंवा कुंपण बसवावं, असं त्यांचं म्हणणं आहे. यामुळं रेल्वेतील ट्रेसपासच्या घटना आणि अपघात दोन्ही कमी होईल. एनएफआयआर याबाबत लवकरच रेल्वे बोर्डाला एक पत्र लिहिणार आहे.
हे वाचा-मद्यपान आणि तंबाखू सेवनात महिलांची संख्या वाढली तर पुरुषांच्या संख्येत घट
देशभरात रेल्वेच्या धडकेमध्ये अनेक नागरिकांचे मृत्यू होत असल्याच्या घटना घडतात. यासाठी काहीवेळा नागरिकांचा तर काहीवेळा रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो. रेल्वे मंत्रालय यावर काय मार्ग शोधणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Selfie, Selfie photo