बंगळुरू, 30 जानेवारी: 1 जानेवारी 2015 रोजी पूनमने आपले कुटुंबीय आणि मित्रमंडळींसमवेत तिचा 28वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.. त्यानंतर दुर्दैवाने गेली पाच वर्षं तिचा वाढदिवस निर्जंतुकीकरणाच्या द्रावणांच्या वासात, शेकडो औषधं आणि आयव्ही ट्यूब्ज आदींच्या सान्निध्यात जात आहे.
तिच्या पोटाच्या भागात दुखत (Stomach Ache) असल्यामुळे तपासणीसाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्या गोष्टीला 29 जानेवारी 2021 रोजी तब्बल 1920 दिवस पूर्ण झाले. तेव्हापासून आतापर्यंत ती हॉस्पिटलमध्येच आहे. तिच्या प्रकृतीत काही सुधारणाही होत नाही किंवा तिला डिस्चार्जही दिला जात नाही. अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे ती जवळपास कोमाच्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. बंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये ती दाखल असून, भारतातील सर्वाधिक काळ हॉस्पिटलायझेशन (Longest Hospitalization) कराव्या लागलेल्या रुग्णांपैकी पूनम एक आहे.
या काळातलं हॉस्पिटलचं बिल 6 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलं आहे आणि अजूनही ते वाढतच आहे. पूनमची मेडिकल समरी (Medical Summary) तब्बल 11 पानांची असून, त्यात तिच्यावर उपचार करणाऱ्या 20हून अधिक डॉक्टर्सच्या नावांची यादी आहे. तिचं ट्रीटमेंट बिल चार पानी असून, त्यात 63 घटकांची यादी आहे. हे सगळं तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना बुचकळ्यात टाकणारं, हृदय विदीर्ण करणारं आहे.
आता 33 वर्षांची असलेली पूनम वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये (Vegetative State) आहे. कोणे एके काळी हेल्दी असलेली आणि हॅपी गो लकी वृत्तीची असलेली अॅक्सेंचर कंपनीत बिझनेस रिपोर्टिंग अॅनालिस्ट म्हणून काम करणारी पूनम आज जेमतेम कशीबशी चालू-बोलू शकते. हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी पाच वर्षांपूर्वीच ती बरी होण्याची आशा सोडली असून, 'बॉडी घरी घेऊन जा' असं तिच्या कुटुंबीयांना सांगण्यात आलं होतं. तिच्या कुटुंबीयांनी मात्र अजूनही आशा सोडलेली नाही. रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल्सनुसार (Rehabilitation Protocols) उपचार केले गेले तर ती आजही बरी होऊन हॉस्पिटलबाहेर पडू शकते, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
हॉस्पिटलला या बाबतीत अनेक प्रेझेंटेशन्स देण्यात आली आहेत, पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. एनएचआरसीसारख्या सरकारी संस्थांकडेही हा मुद्दा मांडण्यात आला आहे; मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही, असं पूनमच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.
पूनमच्या आजच्या या स्थितीसाठी तिचे कुटुंबीय हॉस्पिटलला जबाबदार धरतात. तिचे पती रेजिश नायर कोट्टायमचे आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वीची स्थिती सांगितली. 'पोटातल्या तीव्र वेदनांमुळे, आतड्यात गळती झाल्यामुळे तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर अनेक अवयव निकामी झाले. त्यानंतर हॉस्पिटलने 'बॉडी' घरी न्यायला सांगितलं. त्यानंतर कंटिन्युअस रीनल रिप्लेसमेंट थेरपी, ब्रेन डॅमेज, इर्रिव्हर्सिबल डीप कोमा, त्यानंतर आर्टरी बर्स्ट (रक्तवाहिनी फुटणं)..... हे सगळं संशयास्पद, गोंधळाच्या स्थितीचं निदर्शक वाटत नाही का?'
'तीन ऑक्टोबर 2015 रोजी पूनम पोट दुखत असल्यामुळे स्वतःच्या पायांनी चालत हॉस्पिटलमध्ये गेली आणि आज ती व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे,' असं नायर यांनी सांगितलं. हेल्थ इन्शुरन्स आणि स्वतःचे पैसे या माध्यमातून कुटुंबाने आतापर्यंत 1.34 कोटी रुपयांचं बिल चुकतं केलं आहे. नायर यांना IMB आणि मायक्रोसॉफ्ट कंपन्यांतली नोकरी सोडून स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करावी लागली, जेणेकरून ते स्वतःच्या पत्नीसाठी, हॉस्पिटलसाठी वेळ काढू शकतील.
मणिपाल हॉस्पिटलच्या (Manipal Hospital) मीडिया मॅनेजरना पूनमच्या नेमक्या स्थितीबद्दलच्या माहितीसाठी अनेक ई-मेल्स पाठवण्यात आले; मात्र त्यांची उत्तरं मिळाली नाहीत. तरीही न्यूज-18ला पूनमची कॉम्प्रिहेन्सिव्ह मेडिकल समरी आणि बिल्स मिळाली.
हे ही वाचा-महिलांचा अवमान होतो अशी तक्रार झाल्याने Myntra बदलणार लोगो
आपल्या आयुष्याची सर्वांत भीतीदायक पाच वर्षं असं वर्णन करून नायर यांनी सांगितलं, 'पूनम ही अगदी हेल्दी मुलगी होती. पोटदुखीमुळे ती मणिपाल हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि आता ती अंथरुणाला खिळलेली आहे. तिच्या आतड्यातून गळती होत असल्याचं सांगून तिच्यावर सर्जरी करण्यात आली आणि त्यावेळी झालेल्या चुकांमुळे आज ती या स्थितीत आहे. सर्जरीनंतर पूनमची जी मेडिकल समरी लिहिण्यात आली, त्यात हॉस्पिटलने असं स्पष्ट लिहिलं होतं, की ती पूर्ण शुद्धीवर आली आहे आणि चांगल्या स्थितीत आहे; मात्र जेव्हा हॉस्पिटलच्या लक्षात आलं, की आपल्याकडून काही तरी चूक झाली आहे, तेव्हा त्यांनी मेडिकल समरीमध्ये फेरफार केले. त्यात त्यांनी असं लिहिलं, की पूनम हॉस्पिटलमध्ये आली, तेव्हाच तिची स्थिती गंभीर होती. त्यांचं हे म्हणणं त्यांच्याच आधीच्या म्हणण्याशी विसंगत होतं.'
'ऑक्टोबर 2015मध्ये हॉस्पिटलने सातत्याने आम्हाला सांगितलं, की पूनम तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जगणार नाही; पण पूनमच्या जगण्याच्या जिद्दीमुळे आणि कणखर लढ्यामुळे पूनमने ते म्हणणं खोटं ठरवलं. ती प्राथमिक कोमाच्या स्थितीतून बाहेर आली. जानेवारी 2016पर्यंत ती आज्ञा पाळू लागली, तसंच ग्लासगो कोमा स्केल या चाचणीनुसार एम सिक्स या पातळीपर्यंत आली. ही पातळी शुद्धीवर असण्याच्या मापनातील सर्वोच्च आहे. व्हेंटिलेटरवर असताना ती यशस्वीपणे श्वासोच्छ्वासही करू लागली. ती व्हेंटिलेटरशिवायही जगू शकते, याचं चिन्ह यातून दिसलं,' असं नायर यांनी सांगितलं.
हे देखील वाचा - Vaccine Alert: कोरोनाची लस घेतल्यानंतर लगेच गर्भधारणा टाळा; किमान 2 महिने थांबण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
मात्र, तिची परिस्थिती ज्या औषधामुळे सुधारली, ते अमान्टाडाइन (Amantadine) हे औषधच हॉस्पिटलने बंद केलं. तेव्हापासून तिची स्थिती बिघडली. तेव्हापासून तिच्या आरोग्यात गुंतागुंत निर्माण व्हायला लागली. नायर यांनी सांगितलं, 'तिची परिस्थिती चांगली व्हावी, यासाठी हॉस्पिटलकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीयेत. डॉक्टरांनी पाच वर्षांपूर्वीच आशा सोडून दिलीय; पण पूनम अजून जिवंत आहे. तिच्या संवेदना पुन्हा जागृत होण्यासाठी रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल्सची गरज आहे. तिच्या सध्या नाजूक स्थितीमुळे ती घरी आणल्यावर जिवंत राहू शकत नाही.'
पूनमचे वडील हेम बहादूर राणा लष्करातून निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मुलीच्या दुःखाची वेदना स्पष्ट दिसते. गेली पाच वर्षं दररोज ते हॉस्पिटलला जातात. 'माझी मुलगी शूरपणे लढा देत आहे. तिचा मला अभिमान आहे. वैद्यकीयदृष्ट्या तिच्याकडे दुर्लक्ष केलं जाणं, हॉस्पिटलकडून चुका झाकल्या जाणं, राज्य यंत्रणेची अकार्यक्षमता या गोष्टी धक्कादायक आहेत. माझ्या मुलीच्या बाबतीत जे घडलंय, ते कोणाच्याही बाबत घडू शकतं,' असं राणा म्हणतात. न्यूज-18ने शहरातल्या काही ज्येष्ठ डॉक्टर्सशी या केसबद्दल संवाद साधला. त्यांनी ही बाब धक्कादायक असल्याचं सांगून, आपलं नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं, की ही दुर्मीळातील दुर्मीळ केस आहे.
'20 ते 40 वर्षं वयोगटातल्या कोणाही तरुण व्यक्तीच्या आतड्यांमधून गळती होत असेल, तर त्या व्यक्तीला बरं होण्यासाठी जास्तीत जास्त एक ते तीन महिने लागू शकतात. त्यासाठी पाच वर्षं अजिबात लागणार नाहीत. 28 वर्षांच्या तरुणीला पाच वर्षं हॉस्पिटलयाझेशन असं कधी ऐकलेलंच नाही. यात काही तरी मोठी चूक झालेली आहे आणि याची उच्च पातळीवरून चौकशी व्हायला हवी. न्यूरोपॅथीची ही दुर्मिळातली दुर्मीळ केस आहे,' असं मत एक नामवंत डॉक्टर आणि सर्जननी व्यक्त केलं.
हॉस्पिटलने दिलेल्या पूनमच्या मेडिकल समरीचा (Medical Summary) सारांश असा -
पोटात एका घटकामुळे झालेल्या जखमेमुळे मोठ्या आतड्यातून मळ (विष्ठा) पोटाच्या आतल्या भागात येऊ लागला. त्यामुळे पोटाच्या अंतर्भागात सगळीकडे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं. मोठी सर्जरी झाली, त्या वेळी पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. इन्फेक्शनमुळे मसल्स आणि नर्व्हज् बाधित होऊ शकतात. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया रक्तप्रवाहात आल्यामुळे वारंवार इन्फेक्शन होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health