उत्तराखंड, 7 फेब्रुवारी : उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला आहे. या महापूरात धरणाच्या भीतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 150 ते 200 जण बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिद्धिमा अग्रवाल यांनी या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली आहे.
अनेक लोक दोन वीज प्रकल्पांवर काम करत होते. जोशीमठमध्ये हिमकडा कोसळल्याने पाण्याच्या वेगवान प्रवाहाने वाटेत आलेल्या दोन प्रकल्पांवर काम करत असलेले अनेक लोक बेपत्ता आहेत. दोन्ही वीज प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीज प्रकल्पांवर काम करत असलेल्या 100 ते 150 लोकांबाबत कोणतीही माहिती नसल्याचं समोर आलं आहे. अचानक आलेल्या महापूरानंतर या लोकांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
(वाचा - Uttarakhand News: हिमकडा कोसळल्यामुळे गंगेला महापूर, 2 धरणं खाली करण्याची सूचना)
खबरदारी म्हणून भागीरथी नदीचा प्रवाह थांबवण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात येत आहे. चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैणी गावातील वीज प्रकल्पावर झालेल्या हिमस्खलनानंतर धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे.
(वाचा - जोशीमठमध्ये हिमकडा कोसळून ऋषिगंगावर बांधलेले धरण फुटले, भीषणता दाखवणारे 5 VIDEO)
SDRF सतर्क असून अफवा न पसरवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अफवा न पसरवता केवळ सरकारी अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचं सांगण्यात आलं आहे. या भीषण घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून यातून तेथील परिस्थिती किती गंभीर असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. हिमकडा कोसळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नदीला महापूर आला असून गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking News