पाटणा, 1 ऑक्टोबर: बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Election) रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील तेजप्रताप नगरात गुरुवारी सकाळी ही घटना घडली.
हेही वाचा...बिहारमध्ये 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान, 10 नोव्हेंबरला मतमोजणी
भारतीय जनता पक्षाचे (BJP) जयंत मंडलचे उपाध्यक्ष राजेश कुमार झा उर्फ राजू बाबा हे मॉर्निंग वॉकला गेले असता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. राजेश कुमार झा यांचा जागेवरच मृत्यू झाला. बेउर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तेजप्रताप नगरातील सीताराम उत्सव हॉलजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दरम्यान, राजेश कुमार झा यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांचा कुणासोबत वाद होते का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. भाजप नेत्याच्या नातेवाइकांकडे पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी राजेश कुमार झा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच याबाबत काही ठोस सांगता येईल, अशी माहिती बेउर पोलिस स्टेशनचे प्रभारी फुलदेव चौधरी यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ उडाली आहे.
पुन्हा नितीशकुमारांचं पारडं जड...
बिहारमध्ये सध्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल व भाजपच्या आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे यावेळीही नितीश कुमार यांचं पारड जड मानलं जात आहे.
243 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान...
बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात निवडणूक होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणी अर्थात निवडणुकीचे निकाल समोर येतील. दरम्यान, बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.
हेही वाचा...पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याआधी कोरोनाचा उद्रेक, 17 अधिकारी निघाले पॉझिटिव्ह
एक तासानं मतदानाचा कालावधी वाढवला...
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी मतदानाचा हक्क बजवावा. हा निर्णय नक्षलग्रस्त मतदान केंद्रावर लागू लागू होणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर ती थर्मल स्कॅनर लावण्यात येणार आहे. जवळपास 46 लाख मास्कचा वापर करण्यात येईल. सोबतच पीपीई वापर करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Bihar Election