नाशिक, 06 जुलै: नाशिकचे पोलीस (Nashik Police) उपअधिक्षक शामकुमार निपुंगे (Shamkumar Nipunge) यांनी केलेल्या आरोपाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Parambir Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाहतूक विभागातील गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश केल्यामुळे दुखावलेले तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनीच मला सुभद्रा पवार या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात अडकविल्याचा धक्कादायक आरोप शामकुमार निपुंगे यांनी केला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून 14 जूनला तक्रार मग गुन्हा का दाखल केला नाही. अशी विचारणा विधानसभा उपध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नाशिक पोलिसांना केली असून तत्काळ अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन 1988 साली पोलीस खात्यात रुजू झालेले निपुंगे हे 2016 साली भिवंडी येथील वाहतूक शाखेत कर्तव्य बजावत होते. त्यावेळी बेकायदेशीर वाहतुकीसंदर्भात काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांविषयी तक्रारी आल्याने त्यांनी अवजड वाहचालकांचे जबाब नोंदवून चौकशी सुरू केली होती. यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त असलेले परमविरसिंग यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली होती. ठाणे जिल्ह्यात 2017 निपुंगे यांच्या कार्यालयातील सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यात निपुंगे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
या आरोपांबाबत बोलताना निपुंगे म्हणाले की, 'मी नारपौली येथील गैरव्यवहाराची माहिती संकलीत करण्यास सुरूवात केली होती. त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक थेट परमवीर सिंग यांचे नाव घेऊन एक कोटी रूपये देऊन बदली घेतल्याचे सांगत होते. सुभद्रा पवार हीची हत्या तिचा प्रियकर अमोल फफाळे याने केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे समोर आले होते. मात्र सुभद्रा, अमोल फफाळे आणि सुभद्राचा भाऊ सुजित पवार यांच्यातील संभाषण न्यायालयात सादर केले गेले नाही.'
तसंच, टशवविच्छेदनाचे रेकॉर्डिंग करण्यात आले. छायाचित्र घेण्यात आले होते. प्रत्यक्ष फिर्याद आणि हे पुरावे यांची सांगड नसल्याने ते पुरावेही दाबण्यात आले. 2017 साली मी सर्व कागदपत्रे मिळविण्यात सुरुवात केली. सुभद्रा पवार हिच्या हत्या प्रकरणात माझा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पुराव्यांची सांगड आणि जुळवाजुळव सुरू असल्याने आता ही तक्रार करीत असल्याचे निपुंगे यांनी स्पष्ट केले.
सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; 12 वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती,पाहा डिटेल्स
या गुन्ह्यात गोवले गेल्यामुळे माझी बदनामी होऊन पोलीस खात्यात प्रतिमा मालिन झाल्याचे त्यांनी सांगितले. आडगाव पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीमध्ये त्यांनी परमवीर सिंग यांच्यासह विविध अधिकाऱ्यांवर आपापसांत कट रचून संगनमताने अधिकारपदाचा दुरुपयोग करून खोटे पुरावे तयार करत सुभद्रा यांच्या खुनाच्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत पुराव्यानिशी फिर्याद दिली आहे.
तत्कालीन आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह, पोलिस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त डॉ. डी एस स्वामी, सहायक आयुक्त रमेश धुमाळ, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुक्तार अली बागवान, अमोल फफाळे यांच्याविरोधात अॅट्रोसिटीसह कट रचणे आणि इतर कलमांनुसार शामकुमार निपुंगे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
दरम्यान, 14 जूनला तक्रार दिल्यानंतर, दाखल का केली नाही ? ही विचारणा थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली असून त्याचा अहवाल तत्काळ सादर करा, असे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांना दिले आहे. या प्रकरणात राज्य सरकार गंभीर असल्याचं समोर येतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik, Paramvir sing, Police, Police action