मुंबई, 6 मे: मुंबईच्या चेंबूर-वाशी नाका परिसरात लॉकडाऊनच्या काळात रक्तरंजित थरार पाहायला मिळाला आहे. एका कुटुंबातील तिघांवर 12 जणांनी भररस्त्यावर हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तरुणीची छेड काढल्यावरून हे हत्याकांड झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भारत नगर भागात ही घटना घडली आहे. एका कुटुंबातील तीन जणांवर तब्बल 12 जणांनी धारदार हत्याराने हल्ला करून एकाची हत्या तर दोन जणांना गंभीर जखमी केलं आहे. प्रशांत पानवलकर असं मृत तरुणाचं नाव आहे. तर प्रशांतचे दोन्ही भाऊ (प्रल्हाद आणि प्रवीण) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा.. सरकारचा मोठा निर्णय! रिक्षाचालक, धोबी, न्हावी, शेतकरी, कामगारांना बेरोजगार भत्ता
काय आहे प्रकरण?
आरोपी आशिष यादव आणि अजित गुप्ता या दोघांनी पाच दिवसांपूर्वी एका तरुणीची छेड काढली होती. तरुणीचा बचाव करत प्रशांत पानवलकर या तरुणाने आरोपीशी भांडण केलं होतं. एवढंच नाहीतर या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी आरोपी आशिष यादव आणि अजित गुप्ताविरुद्ध विनयभंग आणि घातक हत्याराने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कोरोनामुळे या प्रकरणात जास्त लक्ष दिले नाही.
हेही वाचा.. गोल्डमॅनचं निधन, साडेआठ किलो सोन्यासह दिली होती राष्ट्रवादीची मुलाखत
लॉकडाऊनचा फायदा घेत गुन्हा दाखल झाल्याचा राग मनात ठेवून आरोपी आशिष आणि अजित यांनी दोघांनी दहा साथीदारांना घेऊन मंगळवारी संध्याकाळी न्यू भारत नगर येथे पीठ घेण्यास आलेल्या प्रशांत पानवलकर याच्यावर तलवारीने आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी आलेले त्याचे भाऊ प्रल्हाद आणि प्रवीणवर वार केले. यात दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सात जणांना आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून पाच जणांचा शोध सुरू आहे, अशी माहिती या विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत देसाई यांनी दिली आहे
हेही वाचा.. LIVE SEX पाहणं महागात पडलं, हॅकर्सनं जाळ्यात अडकवून असा घातला गंडा!