मुंबई, 21 जून: 'संकटाला घाबरणार नाही. मनगटातील ताकद महत्त्वाची. उगाच कोणाच्या पालख्या वाहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तेव्हा कोण, कोणाला, कोणासाठी म्हणाले हे ज्याचे त्याने तपासून घ्यायचे आहे' असं म्हणत शिवसेनेनं (Shivsena) पुन्हा मित्रपक्षासह भाजपला इशारा दिला. तसंच, 'एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे' असा सल्लावजा टोला सेनेनं काँग्रेसला (Congress) लगावला.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या (Samana) अग्रलेखातून शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा दाखला देत काँग्रेसला सल्ला दिला.
'शनिवारी राहुल गांधी यांचाही वाढदिवस होता. यानिमित्ताने काही कार्यक्रम, पक्षप्रवेश असे काँग्रेजी सोहोळे पार पडले. त्यातील एका सोहोळय़ात प्रदेश काँग्रेसकडून पुन्हा स्वबळाची गर्जना केली गेली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळाची भाषा करीतच असतात. त्यांना पृथ्वीराज बाबांची साथ मिळाली. या भक्कम युतीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष होणार असेल तर त्यांच्या आत्मविश्वासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याची भाषा जोरात केलीच आहे. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत आहे, तरीही स्वबळाची भाषा करतोय. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळापेक्षा आज कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. इतर सगळे स्वबळाचे शड्डू ठोकीत असताना शिवसेना गप्प बसणार का? असा इशाराच सेनेनं दिला.
अमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर अंदाधुंद गोळीबार, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू
'शिवसेनेकडे आत्मबळ आणि स्वबळ आहे. स्वबळ हा शिवसेनेचा हक्क आहे. निवडणुका आल्या की फक्त स्वबळाची भाषा करायची हे बरोबर नाही. मग प्रत्येक लढाई ही स्वबळावरच लढण्याची तयारी केली पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती होती तेव्हाही ‘शतप्रतिशत भाजप’ हा कार्यक्रम राबवला गेलाच होता. स्वबळाचे दांडपट्टे तेव्हाही फिरवले गेले. त्यामुळे एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे' असा सल्लावजा टोला सेनेनं काँग्रेसला लगावला.
Vastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा!
'राममंदिर जमीन घोटाळय़ासंदर्भात शिवसेनेकडून काही प्रामाणिक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर शिवसेना हिंदुत्वाचा त्याग करून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत जाऊन बसल्याची पोपटपंची भाजपकडून सुरू झाली. राममंदिर ट्रस्टचा जमीन घोटाळा व हिंदुत्व यांचा परस्परही कसा काय संबंध असू शकतो? अयोध्येतील राममंदिर निर्माणासाठी जो तीर्थक्षेत्र न्यास निर्माण झाला त्यांना रामाच्या नावावर जमीन घोटाळा करण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल सेनेनं उपस्थितीत केला.
'राममंदिर जमीन घोटाळय़ावर प्रश्न विचारले म्हणून भाजपचे लोक शिवसेना भवनावर फुटकळ मोर्चा घेऊन आले. शिवसैनिकांच्या तावडीत ते सापडले व जे व्हायचे तेच घडले. या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बोलवून सत्कार केला. भाजपला ते रुचले नाही व त्यांच्या पोटात दुखू लागले. त्यांच्या पोटदुखीवरही औषध देऊ, असे उद्धव ठाकरे म्हणतात ते महत्त्वाचे आहे. ‘बाबरी आम्ही तोडली नाही’ असे काखा वर करून सांगणाऱ्यांची परंपरा शिवसेनेची नाही' असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Nana Patole, Samana, Sanjay raut, Shivsena