मुंबई, 28 डिसेंबर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा (last day of Maharashtra Assembly Winter Session) दिवस आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे प्रकृतीच्या कारणास्तव अधिवेशनात उपस्थित नाहीयेत. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार होती मात्र, राज्यपालांकडून या निवडणुकीच्या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया न आल्याने ही निवडणूक न घेण्याचा निर्णय मविआ सरकारने घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. (NCP Chief Sharad Pawar calls CM Uddhav Thackeray)
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कायदेशीर बाबी तपासून चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांममध्ये झालेल्या चर्चेनंतर निवडणूक न घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम होते. मात्र, मविआ सरकारने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांकडून अद्याप कुठलाही निर्णय आला नाही. त्यानंतर राज्यपालांच्या अनुमतीशिवाय निवडणूक घेण्याची चाचपणीही करण्यात आली. पण कुठल्याही कायदेशीर पेचात अडकू नये यासाठी राज्य सरकारने आज निवडणूक न घेण्याचं ठरवलं आहे.
वाचा : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी बातमी आली समोर
विधानसभा अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन?
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार नाहीये. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी एक विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते किंवा राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही निवड होऊ शकते.
मविआ सरकारकडून राज्यपालांना तीन पत्र
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबद्दल कार्यक्रम सुद्धा जाहीर केला आहे. राज्यपालांकडे पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळ यांनी राजभवनावर जाऊन भेट सुद्धा घेतली. राज्यपालांनी तांत्रिक कारण सांगत एक दिवस मागून घेतला होता. पण सोमवारी (27 डिसेंबर) पुन्हा पत्र पाठवण्यात आले. आतापर्यंत राज्यपालांना तीन पत्र पाठवण्यात आले आहे. पण अजूनही राज्यपालांनी अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत उत्तर दिलं नाही. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सरकारने 3 पत्र राज्यपालांना लिहिली. एक पत्र शुक्रवारी दुपारी पाठवले होते. तर दुसरं पत्र नेत्यांनी रविवारी स्वतः दिलं आणि तिसरं पत्र सोमवारी (27 डिसेंबर) दुपारी पाठवलं आहे. पण अजूनही उत्तर न आल्याने अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uddhav thackeray, Winter session, महाराष्ट्र, शरद पवार