मुंबई, 02 ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टोलवरून शिवसेनेला चांगला टोला लगावला आहे. मुंबईत टोल वाढ झाली आहे. त्यावर देशपांडे यांनी टीका केली आहे.
संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची व्हिडिओ क्लिप देशपांडे यांनी ट्विट करुन शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांनी 'आपले सरकार आल्यानंतर वचनाम्यात लिहिल्याप्रमाणे महाराष्ट्र टोलमुक्त करणार' असं आश्वासन शिवसैनिकांना दिले होते.
रघुपती राघव राजाराम .पतित पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान.सत्याचा धडा देण्याऱ्या महात्मा गांधीजी ना विनम्र अभिवादन pic.twitter.com/9pW67reHCQ
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 2, 2020
गांधीजींच्या रघुपती राघव राजाराम भजनाची ओळीचा उल्लेख करत देवानं सरकारला सुबुद्धी द्यावी, असा प्रार्थनावजा टोला देशपांडे यांनी लगावला आहे. काल वाढीव टोलला विरोध करण्यासाठी मनसेनं टोल नाक्यांवर आंदोलनही केलं होतं.
दरम्यान, 1 ऑक्टोबरपासून मुंबईतील टोल दरात 5 ते 25 रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. दर तीन वर्षांनी ही टोलच्या दरात वाढ होत असते. त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. मुलुंड, वाशी, दहीसर, ऐरोली, लाल बहाहूर शास्त्री मार्गावर हे पाच टोल नाके आहेत. छोट्या वाहनांसाठी 40 रुपये, मध्यम अवजड वाहनांसाठी 65 रुपये, ट्रक आणि बसेससाठी 130 रुपये, तर अवजड वाहनांसाठी 130 रुपये इतका टोल आता असणार आहे.
मासिक पासही 1400 रुपयांवरुन 1500 इतका करण्यात आला आहे. 2002 ते 2027 अशी 25 वर्षे उड्डाणुलांच्या देखभालीसाठी हा टोल वसुल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात 5 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackery, Sandeep deshpande, Toll, Uddhav Thackery