मुंबई, 05 फेब्रुवारी : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपने दोन उमेदवार जाहीर केले आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. पण, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केला. पण, यावेळी मातोश्रीवर फोन करण्याचं शिंदे यांनी टाळलं.
भाजपचे दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पण विरोधकांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणूक अटळ मानली जात आहे.
(पवारांशी बोलले, राज ठाकरेंशी बोलले, पण मुख्यमंत्री शिंदेंनी टाळला 'मातोश्री'वर फोन)
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांना फोन करून कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मातोश्री अर्थात शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव गटाला फोन करण्याचं टाळलं.
(तुम्ही बंडखोरी करताना कुणाला सांगितलं? राम शिंदेंचा अजितदादांना सणसणीत टोला)
एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर फोन केला नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेनं सुद्धा या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कसबा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी, अशी मागणीच शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली असून अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाले नाहीत. त्यामुळे शिंदे यांनी विनंती केली आहे.
भाजपमध्ये शैलेश टिळक नाराजी
विशेष म्हणजे, पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपकडून उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासनेंना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयावर शैलश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली.
'ब्राम्हण समाजात अस्वस्थता असल्याचं सांगत कुटुंबीयात उमेदवारी दिली असती तर बिनविरोध निवडणूक झाली असती आता ब्राम्हण समाजाचं नेतृत्व करणारा एकही उमेदवार नाही यांची खंत वाटते, असं म्हणत शैलेश टिळक यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करू दिली. शैलेश टिळक हे इच्छुक होते. पण, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
'खुल्या प्रवर्गाचा आवाज दाबण्याचा आज पुन्हा प्रयत्न झाला आहे. सर्वच जातींना योग्य प्रतिनिधीत्व मिळालं पाहिजे, याच भावनेतून हिंदू महासंघ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कसबा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ,' असं आनंद दवे म्हणाले आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
हे. या दोन्ही पोटनिवडणुकांची अधिसूचना 31 जानेवारीला जारी होणार आहे, तर 7 फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 8 फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या निवडणुकांचं मतदान 27 फेब्रुवारीला होणार असून 2 मार्चला निकाल लागणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde