मुंबई, 31 डिसेंबर : मुंबईच्या घाटकोपरमध्ये ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटल्याने त्या भागात महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान 72 इंच जलवाहिनी फुटल्याने तेथे असणाऱ्या 400 घरांमध्ये पाणी शिरले होते. फुटलेल्या जलवाहिनीतून पाण्याचा वेग इतका जोरात होता की आजूबाजूला असणाऱ्या दुकानांमधील साहित्यांसह काही वाहनेही वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
हे ही वाचा : एका तंबाखूच्या पुडीने उकललं महिलेच्या हत्येचं गूढ; पतीच निघाला आरोपी
घाटकोपर परिसरात अचानक रात्रीच्या सुमारास पाईपलाईन फुटली दरम्यान लोक घरात झोपलेले असताना ही घटना घडल्याने मोठा गोंधळ झाला होता. अचानक 72 इंचाची पाण्याची पाईपलाईन फुटली. या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरे, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले. अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे लोक घाबरले, गोंधळ उडाला. या परिसरात पाणी साचल्याने महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
या पाण्याचा दाब इतका जोरदार होता, की ते सुमारे 10 फुटांपर्यंत उसळत होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळविण्यात आली. मात्र, पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितलं.
हे ही वाचा : Sangli : पंढरपूरला निघालेल्या भक्तांवर सिनेस्टाईल दरोडा! दगडफेक, चाकूच्या धाकाचा थरार
दरम्यान, या जलवाहिनीतून पाण्याचा वेग अद्यापही कमी झालेला नाही. घराबाहेर पडणारे लोक पाण्याचा वेग लवकरात लवकर कमी व्हावा अशी प्रार्थना करत आहेत. ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झालेली आहे. त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटल्याच्या घटना घडत आहेत. या आधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरश: घरे कोसळली होती. तर आता देखील ही जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे.