मुंबई, 21 मे: महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना भाजपने पुकारलेले आंदोलन हे 'महाराष्ट्र बचाओ' नसून 'भाजप बचाओ' आंदोलन आहे. कोरोना संकटाच्या काळात आंदोलनाचा फार्स उभा केला जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रातील काही नेत्यांसह राज्यात अस्थिरता पसरवण्याचा कट रचत आहेत, असा काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
हेही वाचा... 'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर.., चक्क तृतीयपंथियाने निलेश राणेंना सुनावलं
भाजपकडून सुरू असलेले गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही. भाजपला धडा शिकवेल, असा इशारा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. भाजप नेत्यांनी महाराष्ट्र द्रोह करू नये, असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाच्या संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून काम करत आहेत, यावेळी अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून आंदोलनाचा फार्स उभा केला जात आहे. या संकटात सर्वांनी एकजुटीने सामना करण्याची ही वेळ आहे. अशी भुमीका फडणवीस यांनीही मांडली होती, पण त्यांची कृती या भूमिकेच्या विरोधात आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता पीएम केअरला मदत केली आहे. खरंतर त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीशी भांडायला हवे होते.
हेही वाचा.. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मामांचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू
मात्र, फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सरकार बरोबर बोलायचे नाही, रोज राजभवनावर जाऊन राज्यपालांसोबत चर्चा करायची आहे. संकटातून मार्ग काढण्यापेक्षा सरकार अडचणीत कसे येईल यात त्यांना अधिक स्वारस्य आहे. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्रद्रोहच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील जनतेला सरकार करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची जाणिव आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.