मुंबई, 30 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी न दिल्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून पुन्हा एकदा राज्यपालांना आठवण करून दिली आहे. पण, आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी पाऊल उचलले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलींद नार्वेकर यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. राजभवन इथं ही भेट झाली. ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीचा विषय राज्यात चर्चेचा विषय असताना आज नार्वेकर यांनी राज्यपाल यांची भेट घेतली. नार्वेकर यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा- 3 मेनंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत
विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती.त्यामध्ये Corona virus च्या राज्यातल्या परिस्थितीवर, उपाययोजनांवर चर्चा झालीच, पण त्याबरोबर ठाकरे यांनी राज्यातल्या अनैतिक राजकारणाविषयी मोदींकडे तक्रार केल्याचं समजतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचं पंतप्रधानांना सांगितलं. त्यामुळे आज नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय घडामोडी वेग आला आहे.
हेही वाचा - ते जाकीट कायमचं उतरलं की हा ‘Lockdown Look’ आहे? शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा!
विशेष म्हणजे, राज्य सरकारकडून राज्यपालांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची राज्यपाल सदस्य म्हणून नियुक्ती करावी असं स्मरण पत्रही देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राज्यपालांची भेटही घेतली. परंतु, अजूनही राज्यपाल यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. उलट कायदेशीर सल्ला घेण्याची हालचाल राज्यपालांनी सुरू केली आहे.
काय आहे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेचप्रसंग?
उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. असं असताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदावर 6 महिने राहता येतं. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला 28 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे संवैधानिक पेच निर्माण झाला आहे.
हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल एकाच कार्यक्रमात, पण...
कोरोना संकटामुळे महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांवरील निवडणुका तहकूब करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्याची शिफारस 6 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाकडून करण्यात आली होती. पण, त्यावर अद्याप राज्यपालांनी कोणताही निर्णय दिलेला नाही.
संपादन - सचिन साळवे