मुंबई, 18 जून : बोरीवलीत भाजप (BJP) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी आणि आक्रमकपणा बघायला मिळाला. बोरीवलीत आज कोरा केंद्र उड्डाणपुलाचं (Kora Kendra Flyover) मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते लोकार्पण झालं. पण याच गोष्टीवर भाजपचा आक्षेप होता. हा उड्डाणपूल तयार व्हावा यासाठी भाजपने पाठपुरावा केला आणि त्याचं लोकार्पण आता शिवसेनेच्या हस्ते होत असल्याचं भाजपचं म्हणणं होतं. त्यातूनच भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. तर शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात तणावाचं वातावरण बघायला मिळालं. या दरम्यान घटनास्थळी आदित्य ठाकरेदेखील उपस्थित झाले. यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी सुरु झाली. पोलिसांनी यावेळी परिस्थिती हाताळण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. भाजप आणि शिवसेना यांच्यात ही श्रेयवादाची लढाई आहे. याच लढाईतून शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. विशेष म्हणजे यावेळी भाजपचे खासदार गोपाल शेट्टी, आमदार सुनील राणे, आमदार मनीषा चौधरी या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले.
BREAKING : बोरीवलीत भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने, आदित्य ठाकरेही घटनास्थळी दाखल, प्रचंड राडा #shivsena #bjp #Mumbai pic.twitter.com/NNCkBvmZfC
— News18Lokmat (@News18lokmat) June 18, 2022
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं लोकर्पण झालं. मात्र या उड्डाणपुलासाठी भाजपनेच पाठपुरावा केला होता. त्यामुळे या उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्याचा अधिकार हा भाजपला आहे, अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांची होती. विशेष म्हणजे भाजपचे कार्यकर्ते ज्यावेळी आंदोलनासाठी आले तेव्हा शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी समजून घेतले नाही. याउलट प्रचंड घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केलं. ( डमी मतपेटी, दिग्गज नेते आणि फाईव्ह स्टार हॉटेल, शिवसेनेची आमदारांसाठी अनोखी रंगीत तालीम ) …आणि आदित्य ठाकरे रिबीन कापून लगेच निघून गेले कोरा केंद्र उड्डाणपुलाचं दोन वर्षांनी लोकार्पण झालं. ढोल-ताशांच्या गजरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पण उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा उत्साह फार काळ टिकला नाही. कारण उत्साच्या वातावरणा ऐवजी परिसरात तणावाचं वातावरण बघायला मिळालं. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याने भाजप आक्रमक झाली. आदित्य ठाकरे कार्यक्रमाला येण्याआधीच कार्यक्रमस्थळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झालेले होते. आदित्य ठाकरे ज्यावेळी तिथे दाखल झाले त्यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी झाली. भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झडप होते की काय अशी परिस्थिती होती. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आदित्य ठाकरे कार्यक्रमस्थळी आले. त्यांनी घाईत रिबीन कापली आणि ते पुढच्या कार्यक्रमासाठी तातडीने निघून गेले.