मुंबई, 19 मे : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. परंतु, दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर आज भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर टीका केली आहे. तसंच, 'कोरोनाची परिस्थिती राज्य सरकारकडून योग्यरित्या हाताळली जात नाही, अनेकांना उपचार मिळत नाहीत', असा आरोपही फडणवीसांनी केला.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजप राज्यभर कोरोना संदर्भात आंदोलन करणारा आहे. या आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी फडणवीस आणि इतर नेते मंडळी राज्यपालांची भेट घेतली.
हेही वाचा - मुंबईहून 1000 किमी केला प्रवास, रस्त्यात झाला अपघात; शुद्धीवर आला आणि...
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत असताना फडणवीस यांनी महाविकासआघाडी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. 'देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही, अनेकांना उपचार मिळत नाहीत', असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला.
तसंच, 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं. राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरू आहे', अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
'आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहे, आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्या. राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करू, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही पाठीशी उभं राहू, मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली, आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहे, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको', अशी टीकाही फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.
'महाविकास आघाडीचे मंत्री अज्ञानी'
'केंद्राने एवढं मोठं पॅकेज दिलं, तरीही यांचं केंद्राकडे बोट आहे. मग ते राजकारण नाही आणि आम्ही सूचना मांडल्या की आमचं राजकारण कसं? मुळात केंद्राने 85 टक्के तिकिटाचे पैसे दिले, राज्याने 15 टक्के द्यायचे होते. मात्र, महाराष्ट्रातील अज्ञानी मंत्र्यांना रेल्वेच्या खर्च किती येतो हेच माहित नाही. त्यामुळे महाराष्ट्र बचाव ही भाजपची भूमिका घेऊन राज्यपाल यांना निवेदन दिले आहे', अशी माहिती त्यांनी दिली.
'म्हणून आंदोलन करणार'
'सामान्य माणसाला रेशन मिळत नाही. घोटाळे सुरू आहेत, केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही. त्यांनाही देण्याच्या सूचना आहेत पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच मिळत नाही. रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही, त्याअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत, एक डॅशबोर्ड बनवून, रुग्णालयातील जागा सांगू शकतो. त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबेल, आता हे उघड्या डोळ्याने पाहणे शक्य नाही म्हणून आंदोलन करणार आहोत', असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
'राज्यात विमानं उतरू द्या'
'परदेशात अडकलेल्यांना भारतात परतायचं आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे विमानं उतरण्यास परवानगी नाही. लोकं व्हिडिओ करुन पाठवत आहेत. त्यांचे हाल होत आहेत. राज्यात विमानं उतरण्यास महाराष्ट्राने परवानगी द्यावी, त्यांना क्वारंटाइन करुन उपचार करता येतील, मात्र त्यासाठी निर्णयाची गरज आहे', निर्णय होत नाहीत, अशी टीकाही फडणवीसांनी केली.
हेही वाचा -राज्यासमोर महिला सरपंचानं ठेवला आदर्श, वाचा या गावाला कोरोनापासून कसं दूर ठेवलं
सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, राज्य सरकारने पॅकेज दिलं पाहिजे, बारा बलुतेदारांचा विचार सरकारने करायलाच हवा, अन्य राज्याने केला मग आमचं सरकार कधी करणार? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP