मुंबई, 25 डिसेंबर : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal bihari vajpayee) यांची आज जयंती आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या जयंती निमित्ती मुंबईत त्यांच्या एका पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात येणार होते. मात्र, यावरुन आता राजकारण होताना दिसून येत आहे. कारण भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी राज्य सरकारवर (State Government) आरोप करत पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाला अदयाप परवानगी दिली नसल्याचं म्हटलं आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कांदिवली येथे वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार होता. परंतु राज्य सरकारने पुतळा उभारण्यासाठी परवानगी दिली नाही असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आजचा पूर्णाकृती पुतळा उभारणीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
भाजप अध्यक्षांचा नियोजित दौरा रद्द
या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबईत येणार होते परंतु काल राज्य सरकारने ऐनवेळी परवानगी नाकारली त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला असा भाजपने दावा केला आहे.
वाचा : ....म्हणून राज्यात पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले नाही, अजित पवारांचे स्पष्टीकरण
या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , विरोधी पक्ष नेते फडवणीस यासह अनेकजण उपस्थिती राहणार होते. आता भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्य सरकारवर आरोप केल्याने शिवसेना विरुद्ध भाजप असा पुन्हा एकदा सामना होताना दिसण्याची शक्यता आहे.
शिवसेना विरुद्ध भाजप
शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष सुरूच असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. संतापलेल्या शिवसैनिकांकडून आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तर कणवलीत स्थानिक शिवसेना पदाधिकारी संतोष परब याच्यावर नितेश राणे समर्थकांकडून प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी, आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली आहे.
वाचा : मुनगंटीवारांना लगेच पहाट आठवते, अजित पवारांच्या टोलेबाजीने सभागृहात एकच हशा
अधिवेशनात नितेश राणेंच्या 'म्याँव-म्याँव'वरुन घमासान
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून म्याँव-म्याँव असे आवाज काढत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचलं होतं. संबंधित प्रकरण हे काल घडलं होतं. या प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बघायला मिळाले.
शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधीमंडळाचे प्रधान सचिवांना पत्र लिहून प्राण्यांचे विचित्र आवाज येत असल्यामुळे विधीमंडळाचं सदस्यांचं लक्ष विचलित होत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे या बेवारस प्राण्यांची गांभीर्याने पाहणी करुन त्यांचा बंदोबस्त करण्याचा सुरक्षा रक्षकांना आदेश द्यावेत, अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Atal bihari vajpayee, BJP, Mumbai