मुंबई, 24 डिसेंबर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session) आजचा तिसरा दिवस देखील वादळी ठरताना दिसत आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे प्रतिनिधी विविध प्रश्नांवर मत मांडताना एकमेकांवर शाब्दिक कुरघोडी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून म्याँव-म्याँव असे आवाज काढत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना डिवचलं होतं. संबंधित प्रकरण हे काल घडलं होतं. या प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बघायला मिळाले.
नेमकं प्रकरण काय?
विधानभवाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे आमदार काल (23 डिसेंबर) घोषणाबाजी करत होते. या दरम्यान आदित्य ठाकरे विधान भवनावर पोहोचले. ते विधान भवनात प्रवेश करत असताना पाऱ्यांवर आंदोलन करत असणाऱ्या आमदारांपैकी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आदित्य ठाकरेंकडे बघून म्याँव-म्याँव असा आवाज काढला. यावेळी त्यांच्या आजूबाजूच्या आमदारांमध्ये हशा पिकला. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच घटनेचे पडसाद आज विधानसभा आणि विधान परिषदेत बघायला मिळाले.
'बेवासर प्राण्यांचा बंदोबस्त करा', मनिषा कायंदेंचं विधीमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र
शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधीमंडळाचे प्रधान सचिवांना पत्र लिहून प्राण्यांचे विचित्र आवाज येत असल्यामुळे विधीमंडळाचं सदस्यांचं लक्ष विचलित होत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे या बेवारस प्राण्यांची गांभीर्याने पाहणी करुन त्यांचा बंदोबस्त करण्याचा सुरक्षा रक्षकांना आदेश द्यावेत, अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केली आहे.
हेही वाचा : हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार?
दोन्ही सभागृहात पडसाद
संबंधित घटनेचे पडसाद आज विधान परिषद आणि विधानसभेत बघायला मिळाले. शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्याचबरोबर विधीमंडळाचे प्रधान सचिवांना पत्र पाठवत कारवाई करण्याची मागणी केली. तर विधानसभेत शिवसेना प्रतौद आणि आमदार सुनील प्रभू यांनी देखील औचित्यचा मुद्दा उपस्थित करुन विधीमंडळ परिसरात ज्याप्रकारे भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर म्याँव-म्याँव आवाज काढून असंसदीय कृत्य केलं. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.
नितेश राणे विधीमंडळ सदस्य आहेत. त्याबद्दल त्यांचा आदरच आहे. पण इतर सदस्यांचाही आदर केला पाहिजे. अशाप्रकारच्या असंवेदनशील कृत्यावर निलंबनाची कारवाई केली पाहिजे, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. "जर कोणीही सदस्य असा आवाज काढत असेल किंवा नक्कल करत असेल तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहीजे. त्यांचं निलंबन झालं पाहीजे, असा कायदा करा", असं सुनिल प्रभू म्हणाले.
सुधीर मुंनगंटीवारांची हरकत
सुनील प्रभू यांच्या निलंबनाच्या मागणीवर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हरकत घेतली. "असं कोणालाही तात्काळ निलंबित करता येणार नाही. एखाद्या राजकीय व्यक्तीची तपश्चर्या भंग केली जाऊ नये. एखादा राजकीय व्यक्ती अनेक वर्ष संघर्ष करुन विधीमंडळात येत असतो आणि त्यासंदर्भात अशी कारवाई लगेच करता कामा नये. अध्यक्षांनी अशा प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन महिन्यांची आमदारांची समिती गठीत करावी. ही समिती असे काही प्रकरणे होतील त्यासंदर्भात माहीती घेईल", असं सुनील मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा : फोन टॅप प्रकरणाला नवे वळण, सायबर सेलने पाठवली फडणवीसांना चौकशीची प्रश्नावली!
अजित पवारांची भूमिका
मुनगंटीवार यांच्या विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली. "एखादा कोणताही सदस्य विधीमंडळामध्ये प्रवेश करतो आणि त्याबद्दल जर कोणी अपशब्द वापरत असेल तर शासन झालं पाहीजे. पण काही तरी नियमावली तयार केली पाहीजे", असं अजित पवार म्हणाले. पण त्यानंतर तालिका अध्यक्षांनी अशी समिती स्थापन करण्या संदर्भात कोणतीही घोषणा केली नाही. दरम्यान, नितेश राणे आज विधीमंडळात उपस्थित नाहीत. ते कणकवली पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदविण्यासाठी गेले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.