मुंबई 15 जुलै : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील 39 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी जाऊन शिंदे आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं. भविष्यात बंडखोर आमदारांचं मन दुसरीकडे वळू नये, यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसाठी डिनर डिप्लोमसीचं (Dinner Diplomacy of Shinde Fadnavis) आयोजन केलं आहे. या गोष्टीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. काय म्हणाले अजित पवार? मुख्यमंत्र्यांकडून उद्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आमदारांना डिनर दिला जाणार आहे. तर उपमुख्यमंत्र्यांकडून रविवारी दोन्ही पक्षाच्या आमदारांना डिनर दिलं जाणार आहे. राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीकरता या स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारची ही डिनर डिप्लोमसी आहे. दोन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्रित डिनरसाठी बोलावलं जाणार आहे. दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण, राज्यावर अतिवृष्टीचं संकट ओढवलेलं असताना सत्ताधारी पक्ष फाईव्ह स्टार हॉटेलमधून आमदारांच्या जेवणावळी उठवताहेत, हे बरोबर नाही जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. ठाकरेंचं ठरलं! बहुमत आमच्याकडं विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेचे उपाध्यक्षांना पत्र निवडणुका अचानक रद्द करणं पूर्णपणे चुकीचं : पवार सहकारी संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात असताना अचानक रद्द करणं पूर्णपणे चुकीचं आहे, अन्यायकारक आहे, यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. सध्या राज्यात नेमके काय चाललंय हेच कळत नाही, सुप्रीम कोर्टानेच सांगितलंय की निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असेल तर असं मध्येच थांबता येत नाही. मग तरीही कशाच्या आधारावर तुम्ही सहकार निवडणुका पुढे ढकलल्या याचा जाब मी सत्ताधारी पक्षाला विचारणार आहे. पावसाळी अधिवेशन ही कशाला पुढे ढकललं? हेच कळत नाही, या दोघांची नुसती मनमानी सुरू आहे, हे बरोबर नाही जनता हे सगळं बघतेय, लोकशाहीत ही मनमानी चालत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.