मुंबई, 04 एप्रिल: गुंतवणूक करणं एक चांगली सवय आहे, कारण जेव्हा आर्थिक अडचणी येतात तेव्हा ही सेव्हिंग कामी येते. मात्र अनेकदा कळत नाही की कोणत्या योजनेत गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं ठरेल. जर तुम्ही पैसे दुप्पट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या (Post Office) किसान विकास पत्र (KVP Kisan Vikas Patra) या योजनेत गुंतवणूक करू शकता. किसान विकास पत्र भारत सरकारची वन टाइम गुंतवणूक योजना आहे.
पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूकदाराला या योजनेत चांगला परतावा तर मिळतोच याशिवाय सरकारी गॅरंटी देखील आहे, त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील. या योजनेमध्ये व्याजदर आणि गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सरकारद्वारे तिमाही आधारावर निश्चित केला जातो. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार किसान विकास पत्राची मॅच्युरिटी अवधी 124 महिने आहे. म्हणजेच या योजनेमध्ये ग्राहकाचे पैसे गुंतवणुकीच्या 124 महिन्या्ंनी म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यांनी दुप्पट होतील. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे. यात एखादा शेतकरी कमीतकमी 1000 तर जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकतात.
(हे वाचा-Post Office ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून बदलला हा नियम)
कोण करू शकतं गुंतवणूक?
यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असतं, जे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. बाँडप्रमाणेच प्रमाणपत्राच्या रुपात ते जारी करण्यात येतं. सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या योजनेअंतर्गत मिळते. तुम्ही याची खरेदी अल्पवयीन मुलासाठी देखील करू शकता. ज्याची देखरेख पालकाकडून केली जाते. KVP मध्ये 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपये पर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, ज्याची खरेदी करता येईल.
यामध्ये किती मिळतोय व्याजदर?
KVP मध्ये व्याजदर 6.9 टक्के निश्चित करण्यात आला आहे. या दरामध्ये 124 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील, जर तुम्ही एकरकमी 1 लाख भरले तर तुम्हाला मॅच्यूरिटीनंतर 2 लाख रुपये मिळतील. या स्कीमचा मॅच्यूरिटी पीरिएड 124 महिन्यांचा आहे. ही योजना इन्कम टॅक्स कायदा 80 सी अंतर्गत येत नाही, त्यामुळे रिटर्नवर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. या योजनेत टीडीएसची कपात केली जात नाही.
(हे वाचा-प्राण्यांसाठी तयार झालेली जगातील पहिली कोरोना लस आहे तरी कशी?)
केव्हीपी एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये स्थानांतरित केले जाऊ शकते. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थानांतरित केले जाऊ शकते. केव्हीपीमध्ये नॉमिनेशन सुविधा देखील आहे. किसान विकास पत्र पासबुकच्या आकारात जारी केले जाते.
द्यावं लागेल PAN आणि आधार
यासाठी 2 पासपोर्ट साइझ फोटो, ओळखपत्र (रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ.) निवास प्रमाणपक्ष (वीजबिल, टेलिफोन बिल, बँक पासबूक इ.) या कागदपत्रांची गरज लागेल. जर गुंतवणूक 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड देखील आवश्यक आहे.
यामध्ये गुंतवणुकीची मर्यादा नाही आहे पण मनी लाँड्रिंगचा धोका टाळण्यासाठी 2014 पासून 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅन अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तर इनकम प्रुफ देखील द्यावा लागेल, जसं की ITR, सॅलरी स्लीप आणि बँक स्टेटमेंट.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, PM Kisan, Post office, Post office balance, Post office customers