नवी दिल्ली, 26 जुलै : चालू आर्थिक वर्षाच्या (2021-22) अखेरीच्या आत जीवन विमा निगम अर्थात एलआयसीचा IPO सादर करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत किसनराव कराड यांनी याबद्दलची माहिती दिली. या दृष्टीने सरकारने मर्चंट बँकर्स आणि लीगल अॅडव्हायझर्सच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. एलआयसीचा आयपीओ हा केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक (Disinvestment) कार्यक्रमाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातच तो आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.
एलआयसी (LIC) ही देशातली सर्वांत मोठी विमा कंपनी असून, तिचे 100 टक्के शेअर्स सरकारच्या मालकीचे आहेत. एलआयसीच्या आयपीओदरम्यान कमीत कमी एक कोटी नवी डिमॅट अकाउंट उघडली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा सार्वजनिक क्षेत्रातला IPO आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात 1.75 लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलं आहे. आतापर्यंत सरकारला निर्गुंतवणुकीतून 764570 कोटी रुपयेच मिळाले आहेत.
दररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती
या आयपीओमध्ये एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठीही 10 टक्के शेअर्स राखीव असतील. त्यामुळे एलआयसीने पॉलिसीधारकांना (LIC Policyholders) आयपीओमध्ये अलॉटमेंटची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीने योग्य पॉलिसीधारकांचा डेटाबेस तयार करायला सुरुवात केली आहे. एलआयसीचे 29 कोटींहून अधिक पॉलिसीधारक आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं होतं, की BPCL, एअर इंडिया, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कंटेनर कॉर्प ऑफ इंडिया, IDBI बँक, BEML, पवन हंस, नीलाचल इस्पात निगम यांसह अनेक सरकारी कंपन्यांचे शेअर्स विकण्याचं नियोजन केलं जात आहे. या महत्त्वाकांक्षी निर्गुंतवणूक योजनेद्वारे 24 अब्ज डॉलरचा निधी उभा करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. या निधीमुळे कोरोना काळात खर्च वाढलेल्या सरकारला आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार आहे.
एलआयसीच्या वार्षिक अहवालानुसार, 2019-20मध्ये एलआयसीची एकूण अनुमानित संपत्ती 32 लाख कोटी रुपये अर्थात 439 अब्ज डॉलर एवढी आहे. भारतीय बाजारपेठेतला एलआयसीचा हिस्सा जवळपास 70 टक्के आहे.
Personal Loan घेणार आहात? त्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष देणं ठरेल फायद्याचं
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (Life Insurance Corporation) अर्थात LIC आपल्या ग्राहकांचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित राखण्यासाठी कायमच विशेष योजना सादर करत राहतं. एलआयसीच्या योजना वेगवेगळ्या वर्गांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या असतात. जीवन शांती (Jeevan Shanti) या योजनेद्वारे दर महिन्याला पेन्शन मिळण्याचा पर्याय असतो. त्यामुळे काही कारणामुळे हातात अचानक मोठी रक्कम आली असेल, तर ती एकरकमी या योजनेत गुंतवून नंतर दर महिन्याला पेन्शन स्वरूपात पैसे मिळवता येतात. एलआयसीच्या कोणत्याही पॉलिसीचा कालावधी सुरू असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला आणि त्याने मृत्यू होइपर्यंतचे सर्व हप्ते नियमितपणे भरले असतील, तर त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विम्याची रक्कम, तसंच पॉलिसीच्या प्रकारानुसार काही बोनस लागू असेल तर तो मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC