विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 18 जून: सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यात शेती देखील अपवाद नाही. शेती उत्पादकतेत होणारी सततची घट, निसर्गाचा लहरीपणा, अस्मानी संकट आदी कारणांमुळे शेती परवडत नसल्याची ओरड आपण कायम ऐकत असतो. मात्र उपराजधानी नागपूर लगतच्या वर्धा जिल्हातील खैरगाव येथील शोभा गायधने यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गेली 2 दशके सेंद्रिय शेतीची कास धरून वर्षाकाठी 8 ते 10 लाख रुपयांचा नफा त्या मिळवत आहेत. 21 वर्षांपासून करतात शेती शोभा गायधने या गेली 21 वर्षांपासून शेती करत आहेत. त्यांच्याकडे 15 एकर शेती आहे. यामध्ये त्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देत बाग फुलवली आहे. ज्यामध्ये वायगव हळद, गहू, तुर, चना, भाजीपाला, फळे आदींचे उत्पादन घेतात. तसेच आंतरपीक म्हणून पालेभाज्या, टोमॅटो, वांगी, लिंबू, शेवगा, भेंडी, गवार आदीसह केळी, जांब, आंबा असे उत्पादन घेतात. वर्षाकाठी निव्वळ 8-10 लाख रुपयांचा नफा मिळत असल्याचे गायधने सांगतात.
नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम “मी गेल्या 21 वर्षापासून सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. रासायनिक खत, फवारणी औषधे, कीटकनाशके, इत्यादींचा अतिरिक्त वापरामुळे मनुष्याच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यात अलीकडच्या काळात अनेक रोगांमागे हे देखील एक कारण असू शकते. आपल्या पिढ्यान् पिढ्या चालत आलेली नैसर्गिक शेती हीच सर्वोत्तम शेती पद्धत आहे. मी 2002 पासून पूर्णतः या पद्धतीचा अवलंब केला आहे,” असेही शोभा यांनी सांगितले. मगन संग्रहालयात प्रशिक्षण वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील खैरगाव आणि आसपासचे सुमारे 600 शेतकरी मगन संग्रहालयाशी जोडले गेले आहेत. त्यातील 400 शेतकरी हे सेंद्रिय शेती करतात. या ठिकाणी आम्हाला दर महिन्यात विविध विषयातील तज्ज्ञ आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येते. त्याचा प्रयोग आम्ही आपल्या शेतीत करत असतो. ज्यामध्ये विविध घोल, अर्क आम्ही नैसर्गीक पद्धतीने तयार करत असून त्याचाच वापर पिकांसाठी औषध आणि रसायन म्हणून करत असतो. त्यात प्रामुख्याने गराडी अर्क, महुआ देशी कल्प, ई एम 2 द्रावण, दशपर्णी अर्क, मासा अर्क इत्यादींचा समावेश आहे, असे शोभा गायधने यांनी सांगितले. तरुणाची भन्नाट शक्कल, पडीक जागेत बाग फुलवली अन् मधाची शेती केली, Video शासनाच्या योजनांचा लाभ शोभा गायधने यांनी शेतीसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवला आहे. शेतामध्ये मागेल त्याला शेततळे या योजनेतून 50 मीटरचे शेततळे तयार केले आहे. त्यामुळे शेतीला लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शेतीला आज 24 तास पाणीपुरवठा होत असतो. त्याचा लाभ त्यांच्या शेतीला होत आहे. खर्च कमी, दर चांगला रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊ लागला आहे. कीटकनाशकांचा पर्याय म्हणून विविध अर्क आणि द्रावणाचा वापर नैसर्गिक पद्धतीने केला जातो. रासायनिक खतांचा वापर होत नसल्याने पूर्णतः विषमुक्त भाजीपाला शेतात घेतला जातो. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतमालाला चांगला बाजार भाव मिळतो आहे, असे गायधने सांगतात. शेतकऱ्याला मिळाला यशाचा मंत्र, देशी गाईंचं संगोपन ठरतंय फायद्याचं, Video विविध पुरस्कारांनी सन्मान शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळायला हवे असे आवाहन शोभा गायधने यांनी केले आहे. शोभा गायधने यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2022 मध्ये त्यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले. आज त्यांच्या परिसरातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.