मुंबई, 20 एप्रिल: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात आज (सोमवारी) कोरोनाबाधित 466 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात कोरोनाने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील सात जणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्ह आणि झूम अॅपच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं.
कोरोनाची लक्षणं लपवून ठेऊ नका. कारण लक्षणं न दिसताही कोरोना रुग्ण सापडत आहे. थोडीशी जरी लक्षणं आढळली तर तातडीने डॉक्टरांकडे जा, स्वत:साठी इतरांना धोक्यात टाकू नका, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मीच माझा रक्षक... मी कोरोनाला हरवणारच, असं सांगत आरोग्यमंत्र्यांनी जनतेचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा...ZP अधिकाऱ्याकडून नियमांची पायमल्ली, संचारबंदीत पुण्यात गेला बायकोला भेटायला!
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 666 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 3 हजार 300 च्या वर गेली आहे. ही संख्या मोठी दिसत असली तरीही 81 टक्के रुग्ण हे अगदी व्यवस्थित आहेत. राज्यात आजपर्यंत 507 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत राज्यात 232 रुग्ण दगावली आहेत. ही चिंतेची बाब आहे. मात्र मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, महाराष्ट्र टिकला पाहिजे यासाठी डॉक्टर, आरोग्य विभागातले कर्मचारी, पोलिस हे सगळे लढा देत आहेत. त्याचे सगळ्यांचे आभार मानतो, असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा.. पुण्यात मृत्यूदर अखेर आटोक्यात; 24 तासांत मृत्यू नाही, बाधितांचा आकडा 627
आयसीएमआरने दिलेल्या सगळ्या सूचनांचं काटेकोर पालन आम्ही करत आहोत, आपल्याला कोरोनामुक्त व्हायचं आहे. घाबरुन जाऊ नका, पॅनिक होऊ नका, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं केलं.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे..
- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहे. त्याचबरोबर घरोघर जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे. त्यासाठी 6359 पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात आहे.
- राज्याचा कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग हा मंदावत असून सुरूवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता सुमारे 7 दिवसांवर गेला आहे. हा दर 20 ते 25 दिवसांवर यावा तेव्हाच काहीशी समाधानाची बाब मानता येईल.
- कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- हायड्रोक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात ह्या गोळ्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे. मत्र ज्यांना हृदयविकार आहे किंवा 60 वर्षांवरील आणि 15 वर्षाखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत.
-काही छोट्या चाचण्या देखील करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये एक्स रे चाचणी तसेच एसपीओटू पल्सऑक्सिमीटर चाचणी करण्यावर भर दिला जाणार आहे.
- ज्या जिल्ह्यात 15 हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रोड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajesh tope