मुंबई, 11 जानेवारी : विधिमंडळात लावण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. तैलचित्रावर ठाकरेंच्या पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. तैलचित्र अपेक्षेनुसार नसल्याची भावना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे तैलचित्रावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तास्थापनेपासून शिंदे आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये खडाजंगी सुरुच आहे. दरम्यान हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा समोर आले आहेत. याचं कारण ठरलंय, विधिमंडळात लावण्यात येणारं बाळासाहेबांचं तैलचित्र. बाळासाहेबांच्या तैलचित्रावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे पक्षाच्या नाराजीनंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेनकडून पलटवार करण्यात आला आहे. गेली अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या सरकारनं काय केलं? असा सवाल उदयोगमंत्री उदय सामंतांनी विचारला आहे.
या वादानंतर विधासभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुढे येत स्पष्टीकरण दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे देशातील प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. नामांकित कलाकारांकडून त्यांचं तैलचित्र मागवलं आहे, यातील सर्वोत्कृष्ट तैलचित्र विधिमंडळात लावलं जाईल. वाद निर्माण करुन कलाकारांच्या कलाकृतीचा अपमान करु नये, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.
येत्या 23 तारखेला विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे, त्यामुळे या कार्यक्रमाआधी ठाकरेंचा पक्ष आक्रमक पवित्रा घेऊन विरोध करणार की मवाळ भूमिका घेणार? हे बघणं गरजेचं ठरणार आहे.