मुंबई, 20 डिसेंबर : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यातील कार्यक्रमात भाषण करताना शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्र (Maharashtra) आणि मुंबईतील (Mumbai) उद्योग पळवले जात आहेत. महाराष्ट्राला पुरेसा निधी दिला जात नाही. केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय, असे गंभीर आरोप सुभाष देसाई यांनी केला. तसेच केंद्राकडून निधीची कमतरता किंवा राज्याच्या वैभवाची पळवापळवी ही आजच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतानाही सुरु होती, असा दावा देसाई यांनी केला आहे.
"अमित शाहांनी काल राजकीय भाष्य केलं होतं. राज्याला गतवैभव मिळवून देण्यात राज्य सरकार हतबल ठरतंय, असे ते म्हणाले. पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे असलेले वैभव पळवून नेण्याचे काम केंद्राने आणि गुजरातने थांबवावे. आम्ही कोरोना काळात 2 लाख कोटी रुपये आणलेत. केंद्राकडून नेहमी राज्यावर अन्याय केला जातोय. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही पळवापळवी झाली. पण ते गप्प बसले. मात्र, आम्ही गप्प बसणार नाही. जागतिक आर्थिक केंद्राचा मान हा मुंबईलाच हवा. कारण आर्थिक केंद्र हे मुंबईतच आहे. पण गिफ्ट त्यांनी गुजरातला सुरु केले. जे चालतच नाही", असा घणाघात सुभाष देसाई यांनी केला.
"IFC बाबतचा अधिकार फक्त मुंबईचाच आहे. सर्वात मोठी शेअर बाजार आर्थिक केंद्र मुंबईतच आहे. जगातील सर्व देशांना त्यांच्या बँका किंवा त्यांचे मुख्यलयं मुंबईतच उघडायचे असते. काही दिवसांपूर्वी दोहा देशाने त्यांची बँक मुंबईतच सुरु केली. IFC केंद्र मुंबईत सुरू झालं तर ते जोरात चालेल. गुजरातच्या गिफ्ट शहरात ते चालत नाहीय. मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र होण्याचा मार्ग अडवू नका. जनतेमध्ये दुजाभाव का करता? महाराष्ट्राची जनता ही भारताची जनता आहे. अमित शाह यांनी दूजाभाव करु नये. महाराष्ट्राला हक्काचा योग्य वाटा मिळणं आवश्यक आहे", असं देसाई यावेळी म्हणाले.
हेही वाचा : रामदास कदमांकडून जीवाला धोका असल्याचा दावा, वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना पोलीस संरक्षण
"दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण संस्था नागपुरात होती, ती दिल्लीला हलवली गेली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याचे सर्व पुरावे देवूनही केंद्र सरकार निर्णय घेत नाही. 2014 ते 2021 पर्यंत केवळ दोन मेडिकल कॉलेज मंजूर. तिकडे उत्तर प्रदेशला मात्र 27 मेडिकल कॉलेज मंजूर झाली. याकरता उत्तर प्रदेशला 2700 कोटी निधी देण्यात आला. तर महाराष्ट्राला फक्त 253 कोटी दिले गेले. सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असतानाही सर्वात कमी रेमडेसिवीर दिले गेले. महाराष्ट्राची 6340 कोटींची जीएसटी थकबाकी केंद्राकडे आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राला तात्काळ मंजूरी द्या. तुमच्या आवडीचे सरकार नसले तरी तुमच्या निर्णयांचा फटका जनतेला बसतोय", असं सुभाष देसाई यांनी ठणकावून सांगितलं.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्यानं राज्याच्या कारभारात काही फरक पडलेला नाही. ते कॅबिनेटमध्ये नेहमी असतात. मुख्यमंत्री अधिवेशनात सहभागी होतील. सोशल मीडियावर काय येतंय ते माहिती नाही", असं सुभाष देसाई म्हणाले. तसेच "शिवसेना नेते रामदास कदमांची पक्ष दखल घेईल. ते नेते आहेत. गंभीर मुद्दे असतील तर गंभीर दखलच घेतली जाईल", असंही ते यावेळी म्हणाले.
अमित शाह यांनी भाषण करताना शिवसेनेला पुन्हा निवडणुकीचं आव्हान दिलं आहे. त्यावरही सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. "ते दोन वर्षांनी बोलतायत. ही त्यांची निराशा आहे. आणखी तीन वर्षे वाट पाहा. नियमांप्रमाणेच तेव्हा मुकाबला आहे. काय होतंय ते पहा", असं देसाई म्हणाले. तसेच हिंदुत्वावर संकट येईल तेव्हा हेच लोक शेपूट घालून बसतील, असा देखील घणाघात त्यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, BJP, Maharashtra politics, Shiv sena, Subhash desai