अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 14 नोव्हेंबर : ठाण्याचं राजकीय वातावरण दिवसेंदिवस चांगलंच तापत चाललं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात ठाण्यात तुफान राडा झाला आहे. या हल्ल्यामध्ये एक जण जखमी झाला आहे. या जखमी कार्यकर्त्याला ठाण्याचा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर ठाकरे गट श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. ठाण्याच्या किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले. ठाकरे गटाकडून मेळावा घेण्यात येत होता. यावेळी शिंदे गटाचे शिवसैनिक योगेश जानकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेदेखील घटनास्थळी उपस्थित होते.
ठाण्यामध्ये ठाकरे-शिंदे गटात जोरदार राडा, शिंदे गटाचे शिवसैनिक योगेश जानकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण#EknathShinde #UddhavThackeray pic.twitter.com/ylAyTRdv9W
— News18Lokmat (@News18lokmat) November 14, 2022
हा राडा झाल्यानंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते श्री नगर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या संख्येने जमले होते. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन गुन्हा नोंदवून घेत आहेत. पोलीस स्टेशन परिसरातही शिंदे समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. हे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. ठाण्यात धुमशान मागच्या काही दिवसांपासून ठाण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मागच्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी कार्यकर्त्याकडून प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. अटकेनंत आव्हाडांसह कार्यकर्त्यांना एक दिवस पोलीस स्टेशनमध्येच राहावं लागलं. अखेर शनिवारी त्यांची जामिनावर सुटका झाली. आव्हाड यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं. जामिनावर बाहेर आल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड अडचणीत आले. कळव्यातल्या पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये झाला. या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला बाजूला केलं. या महिलेने आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला. पोलिसांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपण राजीनामा देत असल्याचं सांगितलं. आव्हाड यांनी राजीनाम्याचा इशारा देताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पुन्हा आंदोलन केलं.