स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 19 जून: शहरातील धावत्या जगात आणि सिमेंटच्या जंगलात प्रत्येकजण विसाव्याचं ठिकाण शोधत असतो. एखाद्या हिरवळीनं नटलेल्या बागेत हा शोध संपून क्षणभर विश्रांती आणि मनाला गारवा मिळतो. सांगलीतील नागरिकांचं असंच हक्काचं विश्रांतीचं ठिकाण म्हणजे शहरातील आमराई उद्यान होय. गेल्या शेकडो वर्षांपासून सांगलीकर या ठिकाणी स्वच्छ हवेच्या शोधात येत असतात. परंतु, आता आमराईत होत असलेल्या अनैसर्गिक सुधारणांमुळे पर्यावरण प्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. आमराई उद्यानाला ऐतिहासिक वारसा सांगलीत आमराई बाग आणि प्रतापसिंह उद्यान अशा दोनच बागा पूर्वीपासून होत्या. मागच्या काही वर्षात यामध्ये भर पडून महावीर उद्यानाची निर्मिती झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या आमराई या बागेत पहाटे फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. ही बाग अत्यंत जुनी आहे. सांगलीचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी या बागेची निर्मिती केली होती. या बागेत त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड केली होती. या बागेत आजही शेकडो वर्ष जुने अनेक वृक्ष आहेत.
महापालिकेच्या अनैसर्गिक सुधारणांचा फटका आमराई उद्यानात मोठ्या प्रमाणात सांगलीकरांची वर्दळ असते. सांगली महापालिका या उद्यानात काही सुधारणा करत आहे. उद्यानात सिमेंटचे रस्ते बांधले आहेत. मात्र, या सुधारणेवर पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. सिमेंटचे रस्ते बांधून मातीशी असणारी नाळ तोडली जातेय. महापालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे बागेचे सौंदर्य आणि नैसर्गिकपणा हरवत असल्याची खंत पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. सिमेंटचा वॉकिंग ट्रेक नकोच आमराईत वॉकिंग ट्रेकच्या नावाखाली सिमेंटचे रस्ते बांधण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या बागेत जे नागरिक अनवाणी मातीत फिरतात त्यांना फिरण्यासाठी मातीच शिल्लक राहणार नाही. आपले पूर्वज म्हणायचे की मातीशी असणारी नाळ माणसाने तुटू देऊ नये. पण आता शहरात मुळातच माती शिल्लक राहिली नसताना आमराई उद्यानात असणाऱ्या मातीच्या वॉकिंग ट्रेकवर सिमेंटचे रस्ते बनवण्याचा अट्टाहास महापालिका का करत आहे? असा संतप्त सवाल सांगलीतील पर्यावरणप्रेमी करत आहेत. Inspiring Story: बैलगाडी उलटली, दोन्ही पाय गेले, पण सचिन थांबला नाही, जिद्दीची अनोखी कहाणी, Video पर्यावरणपुरक सुधारणांची मागणी याठिकाणी अनेक पर्यावरण पूरक उपक्रम राबवता येऊ शकतात. महापालिका प्रशासनाने त्याचा विचार करण्यासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी ते करत आहेत. आमराई बागेत फुलपाखरांसाठी उद्यान बनवण्यात आले होते. त्याला आता अवकळा आली असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी. नव्याने झाडे लावण्यात यावीत. मुलांची खेळणी जी मोडकळीस आली आहेत, ती दुरुस्त करावीत, अशी मागणी आमराई प्रेमी सांगलीकर करत आहेत.