सांगली, 27 नोव्हेंबर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल (Maha Vikas Aghadi) मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या मार्च-एप्रिल महिन्यात या सरकारला अडीच वर्ष पूर्ण होईल. त्यानंतर हे सरकार बरखास्तर होईल. मग शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमध्ये (BJP) पुन्हा युती (Alliance) होऊन युतीची पुन्हा सत्ता येईल, असा खळबळजनक दावा रामदास आठवले यांनी केला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल जयपूर दौऱ्यादरम्यान अशाच प्रकारचं विधान केलं होतं. त्यानंतर आठवले यांनी देखील महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या राणेंच्या भविष्यवाणीवर सुरात सूर मिळवला आहे.
रामदास आठवले आज सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नसल्याचं वक्तव्य केलं. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण होताच शिवसेना आणि भाजप एकत्र येतील. तसेच राज्यात मार्च किंवा एप्रिल महिन्यात सत्ताबदल होईल, असा खळबळजनक दावा आठवलेंनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा : एसटी रस्त्यावर धावली, पण गदारोळांची मालिका, जळगावात दगडफेक, उस्मानाबादमध्ये धक्काबुक्की
दरम्यान, रामदास आठवले यांनी यावेळी राज्यातील सत्ताबदलाचा फॉर्म्युलाच सांगितला. "शिवसेनेला माझं नम्र आवाहन आहे की, त्यांनी अजूनही निर्णय बदलावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करायचं असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. भाजप, शिवसेना आणि आरपीआय एकत्र असलं पाहिजे. त्या दृष्टीकोनातून अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला होता. त्या फॉर्म्युल्यावर आता निर्णय व्हायला हरकत नाही. आता अडीच वर्ष संपल्यानंतर मुख्यमंत्रीपद भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना द्यावं. आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं. अर्धी-अर्धी सत्ता दोघांनी घ्यावी", असं रामदास आठवले म्हणाले.
हेही वाचा : रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरण : अर्जुन खोतकरांची ED कडून 12 तास कसून चौकशी
"महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाहीय. त्यामुळे तिथे तसं होत आहे. लवकरच महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल. मार्च महिन्यात भाजपचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित असा बदल दिसून येईल. तसेच काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. जाहीरपणे गोष्टी गेल्या तर एखादा महिना सरकार आणखी राहिल आणि मग भाजपचं सरकार येण्याची तारीखही पुढे जाईल", असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांनी तर सरकार संख्याबळावर चालत असल्याचं म्हणत सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. त्यामुळे नारायण राणे काय म्हणतात यावर सरकार चालत नाही, असा टोला त्यांनी लगावला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.