पुणे, 25 ऑगस्ट : पुण्यातल्या (Pune) उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या ओशो समाधीला भेट देण्यासाठी योगेश ठक्कर उर्फ स्वामी प्रेमगीत यांच्यासह 500 शिष्यांवर असलेली बंदी मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) जवळपास 11 वर्षांनी उठवली आहे. ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या ट्रस्टीजनी कथित विरोधी कारवायांच्या कारणांवरून या भक्तांना ओशो आश्रमात प्रवेश करण्यास 2011पासून बंदी घातली होती. आता ही बंदी उठवल्यानंतर स्वामी प्रेमगीत यांच्यासह अन्य शिष्यांनी मंगळवारी (23 ऑगस्ट) ओशो यांच्या समाधीला (Osho Samadhi) भेट दिली. 'टाइम्स नाऊ न्यूज'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
आश्रमात प्रवेश मिळण्याची मागणी घेऊन योगेश ठक्कर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी ओशो आश्रमाच्या (Osho Ashram) विश्वस्तांवर गंभीर आरोप केले आहेत.
काय आहेत आरोप?
'ओशो यांच्या मृत्यूनंतर काही परदेशी व्यक्तींनी या साऱ्या जागेचा ताबा घेतला. त्यानंतर तिथली मालमत्ता, दैनंदिन उत्पन्न, मौल्यवान वस्तू या साऱ्या गोष्टी परदेशी नेण्यात आल्या आहेत,' असा दावा योगेश ठक्कर (Yogesh Thakkar) यांनी 'टाइम्स नाऊ न्यूज'शी बोलताना केला. ओशो आश्रमाच्या संपत्तीचा विश्वस्तांच्या शेल कंपन्यांमध्येही (Shell Companies) गैरवापर करण्यात आल्याचा आरोप ठक्कर यांनी ठेवला आहे.
'ओशो आश्रम हा खासगी रिसॉर्ट नव्हे. महाराष्ट्र धर्मादाय ट्रस्ट कायद्यांतर्गत नोंदणी झालेला सार्वजनिक ट्रस्ट (Public Charitable trust) आहे. विश्वस्तांनी मला प्रवेशावर बंदी घातली होती. त्यामुळे न्याय मागणं हा माझा घटनादत्त अधिकार होता. आता कोर्टाने मला ओशो समाधीचं रक्षण करण्यासाठी मोठा दिलासा दिला आहे. विश्वस्त भक्तांना समाधीला भेट देण्यापासून अडवू शकत नसल्याचंही कोर्टाने सांगितलं आहे,' असं ठक्कर यांनी सांगितलं.
ओशो यांचे बौद्धिक संपदा हक्क, तसंच ट्रस्टकडे असलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता यांची शहानिशा करण्यासाठी एक समिती असली पाहिजे, अशी सूचनाही हायकोर्टाने केली आहे. कोरेगाव पार्कमधल्या प्लॉट नंबर 3वर कोर्टाने मनाई आदेश लागू केला असून, तो प्लॉट विकता येणार नाही किंवा विकसितही करता येणार नाही.
46 वर्षांपासून एकही खड्डा नसलेला पुण्यातील रस्ता! पाहा कसा घडला हा चमत्कार VIDEO
विश्वस्तांवर गंभीर ठपका
दरम्यान, मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात या आश्रमासंदर्भात आणखी एक खटला चालू आहे. प्रसिद्ध कलावंत राजीव नारायण बजाज ओशो आश्रमाचा काही भाग विकत घेऊ इच्छितात. त्यांनी आश्रमाच्या विश्वस्तांसोबत 107 कोटी रुपयांचा करारही केला आहे. तसंच, धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विश्वस्तांनी 50 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम स्वीकारलीही आहे.
या प्रकरणी आपण आक्षेप उपस्थित केल्याचं ठक्कर यांनी सांगितलं. विश्वस्तांकडून आश्रमाचा खजिना जाणीवपूर्वक रिता केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 'काही भारतीय विश्वस्तांच्या सहकार्याने परदेशी व्यक्तींनी 2000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे संकेत देणारे पुरावे आमच्याकडे आहेत,' असा दावाही ठक्कर यांनी केला आहे.
पुण्यात उपचारादरम्यान कैद्याचा मृत्यू, रेल्वे पोलिसांच्या मारहाणीने जीव गेल्याचा नातेवाईकांचा आरोप
अन्य भक्तांनीही विश्वस्तांच्या हेतूंवर शंका उपस्थित केल्या आहेत. मार्च 2020मध्ये कोविड लॉकडाउन जाहीर करण्यात आला. मार्च ते जून या कालावधीत झालेला 3 कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी जून महिन्यात विश्वस्तांनी 110 कोटी रुपयांची मालमत्ता विकण्यासाठी सामंजस्य करार केला; पण गेल्या 40 वर्षांतला पैसा कुठे गेला? आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता नाही. हे सगळं संशयास्पद आहे, असा आरोप अन्य एका भक्ताने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai high court, Pune