अमरावती, 01 डिसेंबर : महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप, शिंदे गटात नेहमी वाकयुद्ध होताना पहायला मिळत आहे. दरम्यान शिवसेनेतून बंडखोरी करत 40 आमदारांनी भाजपला साथ दिल्याने महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 50 खोके एकदम ओके असा निशाणा शिंदे गटावर साधला. यावरून विधानभवनाच्या दारात जोरदार राडा झाला होता.
दरम्यान यानंतर शांत असलेले राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटातील 40 आमदारांचा भाजपने बळी दिल्याचेही ते म्हणाले. मिटकरी पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांचा बळी भाजपने राजकीय बळी घेतला आहे. तर आताची वाटचाल मध्यावती निवडणुकीकडे आहे, न्यायालयाचा निकाल आला तर सर्व 16 आमदार अपात्र होतील व सरकार पडेल अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी अमरावतीत दिली.
हे ही वाचा : शिवप्रतापदिनी गैरहजर राहण्याचं उदयनराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले मला कोणाचाही..
यानंतर मिटकरी पुढे म्हणाले की, या सरकारचा आजच निकाल लागला असता परंतु न्यायमूर्ती रजेवर गेले आहेत. त्यामुळे आता अस्वस्थ असलेले मुख्यमंत्री दारोदार नवस करत फिरत आहेत. याच कारणासाठी ते कामाख्या देवीच्या दर्शनालाही गेले होते. अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली. याचबरोबर शिंदे गटाचे सगळे आमदार अपात्र ठरणार आहेत. याबाबत भाजपला भिती आहे म्हणून 40 आमदारांचा भाजपने राजकीय बळी दिला असल्याचे मिटकरी म्हणाले.
ज्या महाराष्ट्रात गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करून जनप्रबोधन केले, त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जादुटोणा बुवाबाजीवर विश्वास ठेवतात हे काही फार चांगले नाही. यासाठीच आज गाडगे बाबांच्या या भूमित येऊन हे सरकार गेले पाहीजे आणि जनतेला अपेक्षित असलेल महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं पाहीजे एवढीच विनंती करतोय, असे देखील ते म्हणाले.
हे ही वाचा : ..तर महाराजांचं नाव घेऊ नका, उदयनराजेंचा भाजपसकट सर्व पक्षांना गंभीर इशारा, म्हणाले..
राज्यपाल कोश्यारी उर्मट
महाराष्ट्रात आज भाजपकडून सोयीचे राजकारण सुरू आहे. रोजगार, शेती आणि उद्योगांच्या प्रश्नांवरून नागरिकांच लक्ष विचलीत करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य केले आणि त्यांना भाजपचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीने साथ दिली, हे दोघेही अतिशय उर्मट असून त्यांनी केलेले वक्तव्य हे वेदनादायक आहेत, अशी टीका त्यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, BJP, Cm eknath shinde, NCP