नाशिक, 25 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचंही सदस्यत्व धोक्यात आलं आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता माझ्यावरची कारवाईच बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे ते हक्कभंग समितीमध्ये आहेत. ज्यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे पुरावे दिले आहेत ते हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. अशा समितीपुढे कुणाला न्याय मिळू शकतो? असा प्रश्न उपस्थित करत, तुम्ही काड्या करा, आम्ही बांबू घालू”, असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिक येथे आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
माझ्यावरची कारवाई बेकायदेशीर : संजय राऊत
“काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली, तशीच आपली खासदारकी रद्द करण्याचा प्रयोग चालू आहे. मी माफी मागितली असती तर तुरुंगातही गेलो नसतो. माझ्यामध्ये सुद्धा या महाराष्ट्राचं स्वाभिमानाचं रक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राचं रक्त आहे. बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यावर केलेले संस्कार गुडघे टेकण्याचे नाहीत”, असं संजय राऊत ठामपणे म्हणाले. “मी माफी मागितली असती तर सुरत, गुवाहाटी, गोवा करत परत मुंबईत आलो असतो, माझं तुरुंगात जाण्यापासून रक्षण झालं असतं. मला आणि माझ्या कुटुंबाला जेरीस आणण्यासाठी माझ्याविरोधात जे असंख्य खोटे गुन्हे दाखल केले आहेत, ते मला टाळता आलं असतं. पण त्यापैकी मी काही केलं नाही”, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांचं प्रकरण नेमकं काय?
संजय राऊत यांनी विधिमंडळाबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय विधानसभा हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली होती. राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव शनिवारी अर्थसंकल्पीय अधिवेनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर तो पुढील कारवाईसाठी असलेल्या राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.
वाचा - काँग्रेसनंतर ठाकरे गटाला बसणार धक्का? राहुल पाठोपाठ राऊतांचीही खासदारकी जाणार?
खासदार संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता राज्यसभेत गेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यसभा संजय राऊत यांच्या हक्कभंग प्रस्तावावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांच्यानंतर संजय राऊत यांचीही खासदारकी जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
संजय राऊत यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
सध्याचं विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी 1 मार्च रोजी कोल्हापुरात माध्यमांना दिली. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा हा अपमान असल्याचा आरोप यावरून करण्यात आला. याच वक्तव्यावरून राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut, Uddhav Thackeray