पुणे, 31 जानेवारी : राज्यात मागच्या आठवड्यात वातावरणात अचानक बदल झाल्याने ढगाळ वातावरणामुळे काही भागात पावसाने हजेरी लावली. परंतु उत्तर भारतात अचानक वातावरणात बदल झाल्याने बर्फवृष्टी होत आहे. यामुळे उत्तर भारताच्या हवामानाचा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्यापासून (दि.01) फेब्रुवारीपासून थंडीची लाट येण्याची शक्यता हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरेतील काही राज्यात वातावरण पारा घसरल्याने बर्फवृष्टी होत आहे. या वातावरणातील बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दिसून येणार आहे. 1 फेब्रुवारीपासून थंडीचा कडाका वाढण्याचा इशारा हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.
हे ही वाचा : हिवाळ्यात आवर्जून खा हा रानमेवा! आरोग्याला होतात चमत्कारिक फायदे
राज्यात काल (दि.30) सोमवारी नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात सकाळी उशिरापर्यंत दाट धुके होते. समोरचे काही दिसत नसल्याने हेडलाइट लावून वाहने चालवावी लागत होती. थंड वारे वाहत नसल्याने थंडीचा कडाका कमी जाणवत होता. राज्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून किमान आणि कमाल तापमानात चढउतार होत आहे. औरंगाबादेत 11.8 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदवण्यात आले.
राज्यात या भागात थंडी वाढणार
पुणे, मध्य महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढणार आहे. मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. गुजरातमार्गे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पालघर, उत्तर मुंबई आणि ठाण्यावर अधिक परिणाम जाणवणार आहे. 30 जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
हे ही वाचा : हिवाळ्यातील अनेक त्रास चुटकीसरशी दूर करते तुळस, दिनचर्येत असा करा वापर
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात अद्यापही थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातील इतर भागात थंडीचा जोर 26 जानेवारीपर्यंत कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, नवीन अंदाजानुसार आता पुन्हा राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.