विशाल पाटील, प्रतिनिधी नागपूर, 18 सप्टेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन दिवसीय विदर्भ दौऱ्याला सुरूवात झाली आहे. राज ठाकरे सकाळी नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले आहे. आज दिवसभर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी राज ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शस्त्रक्रियेनंतर नागपूरमध्ये दाखल झाले आहे. नागपूरसह अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यालाही ते भेट देणार आहेत. तसंच सर्व पदाधिकाऱ्यांना देखील ते भेटणार आहेत. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर येथील महापालिका निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. या निवडणूक मनसे संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे सांगण्यात येतंय. आज, नागपूर येथील शासकीय विश्रामगृह रवी भवन इथं दिवसभर बैठक होणार आहे. (शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? दिवाळीआधी मिळणार मंत्रिपदाचे गिफ्ट) विशेष म्हणजे, मुंबई-पुणे आणि नाशिक पट्ट्यात राजकीय अस्तित्व असलेल्या मनसेला गेल्या दीड दशकांत विदर्भात फारसं राजकीय अस्तित्व निर्माण करता आलं नाही. पण गेल्या काही दिवसांतल्या राजकीय उलथापालथीनंतर राज ठाकरे आता विदर्भाच्या दौऱ्यावर जात आहे. राज ठाकरे 18 आणि 19 सप्टेंबरला नागपुरात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. 20 सप्टेंबरला राज चंद्रपूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. तर 20 आणि 21 सप्टेंबरला ते अमरावतीतल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. (रत्नागिरीत शिवसेनेच्या खासदाराविरोधात शिवसैनिक नाराज, आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार) राज ठाकरेंनी पक्षस्थापनेपासून अनेक वेळा विदर्भ दौरा केला. पण मनसे विदर्भात कधीच रुजली नाही. एखादा राजकीय अपवाद विदर्भात वगळता मनसेची पाटी कोरीच राहिली. राज ठाकरेंकडे विदर्भात कार्यकर्त्यांची भक्कम फळीही नाही. आताही मनसेला पक्ष वाढवायचा असले तर त्यांना थेट भाजपसारख्या तगड्या पक्षाला टक्कर द्यावी लागणार आहे. राज ठाकरेंसाठी मुंबई-पुणे आणि नाशिकची राजकीय जमीन जेवढी भुसभुशीत होती तेवढी विदर्भात तर नक्कीच नाही. त्यामुळे राज ठाकरेंना एक दोन दौऱ्यांपुरता मर्यादित न राहता विदर्भातल्या राजकीय मशागतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.