नागपूर, 22 सप्टेंबर : तब्बल तीन वर्षानंतर उपराजधानीत उद्या शुक्रवारी भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी- ट्वेंटी क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये शिगेला पोहचली आहे. मात्र, अल्पावधीतच या क्रिकेट सामन्याची तिकिटे विकली गेली आहे, तसेच उद्या पावसाचा यलो अलर्ट असल्यामुळे बऱ्याच क्रिकेट चाहत्यांची हिरमोड झाली आहे.
बुधवारी दोन्ही संघाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानिमित्ताने क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी बसच्या मागे लागून सेल्फी, रील बनवण्यासाठी वर्धा मार्गावर अतिहौशी क्रिकेट रसिकांची चांगली धडपड दिसून आली. नागपुरात शेवटचा टी-२० सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये खेळला गेला होता. त्यामुळे नागपूरकर क्रिकेटप्रेमींना या सामन्याची अधिक उत्सुकता आहे.
पावसाचे सावट
हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविल्याने या सामन्यावर पावसाचे दाट सावट आहे. पावसामुळे क्रिकेट शौकिनांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भात २२ सप्टेंबर किंवा त्यानंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूरसह विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. सर्व क्रिकेटरसिक 'रेन रेन गो अवे' अशी आर्त साद घालत आहेत.
क्रिकेट सामन्यासाठी ५ कोटींचा विमा
सामन्याचा विमा काढण्यासाठी विविध विमा कंपन्यांशी सध्या वाटाघाटी सुरू असून, त्यांना कोटेशन मागितले आहे. दुर्दैवाने पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर, त्या स्थितीत प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटांचे पूर्ण पैसे परत केले जाणार आहेत. जर वेळेपर्यंत विमा निघाला नाही आणि पावसामुळे सामना रद्द करण्यात आल्यास व्हीसीएला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सध्याचे पावसाळी वातावरण आणि पुढील आठवड्यात पुन्हा पावसाची शक्यता लक्षात घेता विमा कंपन्याही सध्या द्विधा मनःस्थितीत आहेत. सामना खेळला न गेल्यास विमा कंपनीला नुकसानापोटी व्हीसीएला मोठी रक्कम द्यावी लागणार आहे.
Ind vs Aus : रोहित शर्मानं सांगितला मॅचचा टर्निंग पॉईंट, पराभवाबद्दल म्हणाला...
जामठा ते रहाटे कॉलनी 'ग्रीन कॉरिडॉर'
45 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या जामठा स्टेडियममध्ये आतापर्यंत 12 पुरुषांचे व दोन महिलांचे टी-20 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यासाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. सामना संपल्यानंतर रात्री परत येताना रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून जामठा ते रहाटे कॉलनी असा ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात होणारी संभाव्य कोंडी टाळता येईल.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, जामठा स्टेडियम, रेडिसन ब्ल्यू आणि ली मेरिडन या ठिकाणी बंदोबस्त असेल. २१ ते २४ असा हा बंदोबस्त राहणार असून विदेशी दर्शक आणि पाहुण्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष असणार आहे. स्टेडियमच्या १३ प्रवेशद्वारांवर पोलीस राहणार असून मैदानामध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनने खासगी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून विशेष नियोजन करण्यात आले आहे. तब्बल ६०० पोलीस यासाठी तैनात असतील. ७ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, ३५ निरीक्षक, १३८ सहनिरीक्षक आणि १६०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. मैदानाच्या काही अंतरावर वाहनतळ असून मैदानापर्यंत बससेवा देण्यात आली आहे.
Ind vs Aus ... आणि भर मैदानात रोहितने दिनेश कार्तिकचा गळा पकडला! Video Viral
मध्यरात्री एकपर्यंत मेट्रो
भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी जामठा स्टेडियमवर दुपारी ४ वाजेपासून जाऊ शकतात. सामना संपल्यावर वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जामठा ते रहाटे कॉलनी असा ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात येणार आहे. तर क्रिकेटप्रेमींना इच्छितस्थळी पोहचता यावे यासाठी महामेट्रोच्या वतीने रात्री एक जेथपर्यंत मेट्रो फेऱ्या सुरू राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Nagpur, Nagpur News, T-20 cricket