वर्धा, 17 मे : निधी वाटपावरून भाजपमध्ये धूसफूस सुरू असल्याचं समोर आलं आहे. निधी वाटपावरून नाराज असलेल्या भाजप आमदाराने थेट अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. कारंजा शहरासाठी नगर पंचायतीला दिलेला निधी आपल्याला विश्वासात न घेता दिलाय. हा निधी आष्टी नगर पंचायत आणि आर्वी नगर पालिकेला वळता करावा, अन्यथा आपण राजीनामा देणार असल्याचा इशारा आर्वी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. पत्रात काय म्हटलं? त्यामुळे वर्ध्याच्या राजकारणात आता दादाराव केचे विरुद्ध सुमित वानखेडे असा नवीन वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हे मूळचे आर्वी येथील आहे. त्यांच्याच माध्यमातून कारंजा नगर पंचायतला निधी देण्यात आला. पण हा निधी देताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचा दावा आमदार केचे यांनी केला आहे. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही तर राजीनामा देणार असल्याचा उल्लेख देखील त्यांनी पत्रात केला आहे.
त्यांनी या पत्रात आपली नाराजी व्यक्त केली आहे. भाजपला आर्वीमध्ये वाढविण्यासाठी आपण आपलं आयुष्य खर्ची घातलं. आता जर उपमुख्यमंत्र्यांचे पीए लुडबूड करत असतील तर तो आपल्या अस्तित्वाला धोका आहे, आपण या प्रकारानं नाराज असल्याचं केचे यांनी म्हटलं आहे.