मुंबई, 31 जुलै : 'पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. गेल्या चार तासांपासून ईडी चौकशी सुरू आहे. दोन वेळा समन्स बजावूनही राऊत चौकशीला हजर न झाल्यामुळे ईडीचे पथक राऊतांच्या घरी पोहोचले. अद्याप चौकशी सुरू असून अटकेची शक्यता तुर्तास नाकारली आहे.
पत्राचाळ प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना दोन वेळा समन्स बजावला होता. समन्स बजावल्यानंतरही संजय राऊत हे ईडीच्या चौकशीला हजर राहिले नाही. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे संजय राऊतांनी चौकशी येण्याचं टाळलं. आज संजय राऊत हे मुंबईत होते. हीच संधी सांधून ईडीच्या टीमने सकाळी 7 वाजताच संजय राऊत यांच्या भांडुप येथील घर गाठले.
(हिशेब तर द्यावाच लागेल, संजय राऊतांवरील कारवाईने सोमय्या सुखावले)
संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. त्यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. जबाब नोंदवल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना जर राऊत यांना कार्यालयात घेऊन जाऊन चौकशी करायची असेल तर तसं ईडीचे अधिकारी करू शकतात. ईडीच्या कार्यालयात नेल्यानंतर अटक करायची की नाही, याचा निर्णय तिथेच घेतला जाईल,अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, संजय राऊतांच्या भांडुपच्या घरी ईडी पथक तळ ठोकून आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी ट्वीट करून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022
'तरीही मी शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई, खोटे पुरावे.. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही' असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
तरीही शिवसेना सोडणार नाही.. pic.twitter.com/UNrnxNCt0z
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022
दरम्यान, राऊतांच्या घराबाहेर cisf बंदोबस्त तैनात आहे. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं राऊतांच्या घराबाहेर निदर्शनं सुरू केली आहे. जोपर्यंत ईडीचं पथक चौकशीसाठी राऊतांच्या घरी असेल तोपर्यंत चोख बंदोबस्त याठिकाणी असणार आहे. सकाळी साडेसात वाजता पथक राऊतांच्या घरी पोहोचलं आहे. पत्राचाळ प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी केली जाऊ शकते. संपत्तीच्या स्त्रोताबद्दलही त्यांना अनेकदा विचारण्यात आलं होतं. राऊत आणि कुटुंबीय सध्या घरीच आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.
(सोनं महागलं; एक तोळे सोन्यासाठी किती रुपये जास्त द्यावे लागतील?)
या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला. मध्यंतरी राऊत यांनी 55 लाख रुपये भरले असल्याचा दावा केला होता. तेव्हापासून राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.