खेड,10 मे: माणसाच्या जीवनाचा काही भरवसा नाही. कुणासोबत कधी काय घडेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे घडली आहे. कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या विन्हेरे नातूनगर मार्गावर अत्यंत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला. अनेक दिवस जंगलात पडून राहिल्यानं मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट होती. अखेर पार्थिवावर जंगलातच अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर आली. त्यामुळे या व्यक्तीचं पार्थिवही घरी पोहचू शकलं नाही.
हेही वाचा..ऑर्थर रोडनंतर आता भायखळा तुरुंगातही घुसला 'कोरोना', महिला कैदी पॉझिटिव्ह
लॉकडाऊनमुळे सदाशिव भिकू कदम (वय 58) हे 3 मे रोजी ठाणे येथून खेडमधील वरची हुंबरी या गावात येत होते. मात्र, जंगलात वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. विन्हेरेनजीक जंगलात त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याच ठिकाणी विन्हेरे व वरची हुंबरी गावातील मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
नोकरीनिमित्ताने ते ठाणे येथे वास्तव्यास होते.
लॉकडाऊनमुळे 4 मे रोजी ते गावी येण्यासाठी पायी प्रवासाला निघाले. 6 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्नीस संपर्क साधून सायंकाळपर्यंत घरी येतो, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल नॉट रिचेबलच लागत होता. जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलांना शनिवारी त्यांचा मृतदेह दिसून आला. याबाबत महिलांनी पोलीस पाटील व सरपंच यांना कळवलं. त्यांनी कशेडी घाटाला पर्याय असलेल्या विन्हेरे मार्गावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांशी संपर्क साधून मृतदेहाबाबत माहिती दिली.
हेही वाचा..जितेंद्र आव्हाड जिंकले.. कोरोना हरला! तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या
मृतदेह कुचलेल्या व प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत आढळल्याने सुरुवातीला त्यांची ओळख पटत नव्हती. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावर ओळख पटल्यानंतर येथील पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेबाबत कळवलं. पोलीस व वरची हुंबरीतील 10 ते 12 ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. मृतदेहाची अवस्था पाहून त्याचठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.