मुंबई, 22 मे: महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला होता. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात (Maharashtra Lockdown) लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सुरुवातीला राज्य सरकारनं 15 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर 1 जून 2021 पर्यंत वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन (Lockdown) असणार आहे. आता हा लॉकडाऊन संपायला अवघे 9 दिवस उरले आहेत. त्यामुळे 1 जून राज्यात लॉकडाऊनची कशी स्थिती असेल लॉकडाऊन संपेल की वाढेल असे प्रश्न जनतेला पडू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा काहीसा कमी झालेला दिसत आहे. मात्र दुसरीकडे राज्यात ब्लॅक फंगससारखं नवं संकट उभं ठाकलं आहे. त्यातच राज्यात लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेची अशा समस्याही राज्य सरकारपुढे आहेत. त्यामुळे 1 जूननंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र 1 जूननंतर निर्बंध हळूहळू शिथील होतील की नाही याबाबतही संभ्रमता आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौरा केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंर्दभात महत्त्वाचं वक्तव्य केलं. हेही वाचा- देशाच्या भल्यासाठी रोहित पवार सरसावले, केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेऊन केवळ चार दिवस झाले. कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली आहे. मात्र गेल्या लाटेच्या वेळी तुम्ही अनुभव घेतला आहे. गेल्या वेळी आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं. मात्र काही प्रमाणात शिथिलता आणली आणि त्यानंतर कोरोना चौपटीनं वाढला. त्यामुळे सध्याच्या लॉकडाऊनचे काय परिणाम होतात हे पाहिलं जाईल. त्यानंतर निर्णय घेऊ. तसंच सध्याची परिस्थिती बघून लवकरच आढावा बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा करुन निर्बंध शिथील करायचे की नाही यावर निर्णय घेता येईल. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्याही घटलेली नाही. आता तिसऱ्या लाटेचा धोका पाहत ऑक्सिजनचा योग्य पुरवठा आवश्यक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 14 जूनपर्यंत शिवभोजन थाळी मोफत राज्यातल्या गरीब आणि गरजू लोकांना 14 जूनपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या ब्रेक द चेन या अभियानांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातल्या विविध समाजघटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. या पॅकेजमध्ये राज्यातल्या गरीब आणि गरजू लोकांना 15 एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली होती. दरम्यान आता ही मुदत आणखी एका महिन्याभरासाठी वाढवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.