कोल्हापूर, 26 जानेवारी : शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कधीच गेला असून उद्धव ठाकरे यांनी आता काँग्रेसचा वारसा घेतला असल्याचा टोला दीपक केसरकर यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे हे स्वत:च मिंधे झाले आहेत, त्यामुळे ते शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नसल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
केसरकर यांनी नेमकं काय म्हटलं?
दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कधीच गेला असून उद्धव ठाकरे यांनी आता काँग्रेसचा वारसा घेतला आहे. उद्धव ठाकरे हे स्वत:च मिंधे झाले आहेत, त्यामुळे ते शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाहीत. हिंदुत्त्वापासून दूर व्हा असं बाळासाहेबांनी कधीही सांगितलं नाही. शिवसेना आणि भाजप ही युती बाळासाहेब ठाकरे यांनीच निर्माण केली होती, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंना सल्ला
दरम्यान यावेळी त्यांना जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रियाताईंबद्दल कधीही वाईट बोलणार नसल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना सल्ला देखील दिला आहे. आरोप करताना आदित्य ठाकरे यांनी संयम बाळगला पाहिजे, कारण ते त्यामधून स्वतःला आणि ठाकरे घराण्याला डॅमेज करत असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.