साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 25 मार्च : मधमाशा किंवा त्यांच्या पोळ्यांना पाहून बरेचजण घाबरून जातात. अशावेळी चुकीच्या कृती करून एक तर त्या मधमाशांना मारले जाते, पोळे नष्ट केले जाते किंवा त्याच मधमाशांकडून इजा करवून घेतली जाते. मात्र, याच मधमाशांसाठी देशातील एक अभिनव उपक्रम कोल्हापुरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून राबवला जात आहे.
खरंतर बऱ्याच वेळा मोठ्या बिल्डिंगच्या कोपऱ्यात, झाडांच्या फांदीला, किंवा अजून कुठे आपल्याला मधमाशांचे पोळे दिसले तर आपण तिथे असुरक्षित आहे, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात येते. त्यामुळे बऱ्याचदा मधमाशांची अशी पोळी जाळून काढली जातात. यामुळे त्या पोळ्यातील मधमाशा तर मरतातच पण त्या पोळ्यातील मधाचा अमूल्य ठेवा देखील नष्ट होतो. कित्येकदा बिथरलेल्या मधमाशीच्या चाव्याने मृत्यू देखील होऊ शकतो. असे प्रकार टाळण्यासाठीच मधमाशी मित्र ही संकल्पना कार्यरत आहे.
नागरिकांनाही मधमाशीमुळे त्रास होणार नाही आणि मधमाशांनाही कोणताही त्रास होणार नाही, यासाठी मधमाशांची पोळी सुरक्षितपणे काढणे महत्वाचे आहे. या उपक्रमांतर्गत याचबाबतचे तंत्रशुध्द प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमातून नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.
काय आहे उपक्रमाचा उद्देश
मधमाशी मित्र हा भारतातील पहिलाच असा अभिनव उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम गेले काही महिने प्राथमिक स्तरावर सुरू आहे. या उपक्रमात मधमाशा वाचवणे हा मुख्य उद्देश आहे. मधमाशांचा उपयोग शेतामध्ये पिकांचे परागीभवनासाठी उपयोग होतो. तसेच मधमाशांपासून मध, मेण, पराग, विष, रॉयलजेली अशी अनेक मौल्यवान उत्पादने मिळतात. तर मधमाशा या जीवसृष्टीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करण्याची सर्वांची जबाबदारी सर्वांची आहे. आणि यासाठीच प्रयत्न करणे हे मधमाशी मित्रांचे कार्य आहे. त्यामध्ये मधमाशी पोळ्यांच्या संदर्भातील उपाययोजना करणे, मधमाशा पालन उद्योगासमोरील छोट्या छोट्या समस्या दूर करणे यामध्ये मधमाशी मित्रांची भूमिका महत्वपूर्ण आहे.
कोल्हापुरची मनपा शाळा खाजगी शाळांना देते टक्कर, पालकांच्या रात्रभर गर्दीच कारण उलगडलं, Video
मधमाशांपासून अशी घ्या काळजी
मधमाशा स्वत:हून हल्ला कधीच करत नाही. त्यांना धोका वाटल्यास मधमाशा पोळ्यावरून उठतात त्यावेळी खालील प्रमाणे दक्षता घ्यावी,
1. आपण आहे त्या ठीकाणी स्तब्ध राहावे.
2. मधमाशा जवळ आल्यावर कोणत्याही प्रकारे हालचाल करू नये.
3. वाहनावरून प्रवास करत असल्यास आहे त्या ठिकाणी बाजुला वाहन घेऊन स्तब्ध राहवे.
4. वेगाने वाहन चालविल्यास मधमाशा आक्रमक होतात.
5. उग्र वास (सेंट, आत्तर, फॉग) इत्यादी मुळे मधमाशा आक्रमक होऊ शकतात.
वरील सूचना लक्षात घेऊन मधमाशा आपल्यावर हल्ला करण्यास उद्युक्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून करण्यात आले आहे.
किल्ले वाचवण्यासाठी मैदानात उतरले 'दुर्गवीर', तरुणाईचं काम पाहून वाटेल अभिमान, Video
पोळे काढण्यासाठी करा फोन
दरम्यान दुर्मिळ होत चाललेल्या आणि महत्त्वाच्या आग्या मधमाशांबाबत देखील जिल्हा प्रशासन सतर्क आहे. अशा मधमाशांचे पोळे सुरक्षितपणे काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर या कार्यालयाच्या 1077 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधवा, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.