साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 04 फेब्रुवारी : शाळेत विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत याकरिता वर्गातील फळ्यावर सुविचार लिहिला जातो. तिथूनच मुलांना सुविचार वाचायची सवय होते. कोल्हापुरातील काही रस्त्यावरून चालताना बऱ्याच जणांना आजही सुंदर विचार रोज वाचायला मिळत आहेत. हे सुविचार त्या फलकांवर नित्यनियमाने लिहिण्याचे काम एक गृहस्थ करत आहेत. त्यांच्या रोजच्या या फलक लेखनाची आता आसपासच्या नागरिकांना सवयच पडली आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील आठ नंबर शाळेजवळ असणाऱ्या मिथिला अपार्टमेंटमध्ये राजेंद्र शंकर सबनीस हे सद्गृहस्थ राहतात. वाचन संस्कृती टिकावी म्हणून दुसऱ्याला सांगत बसणारे बरेच जण असतात. पण वाचकांना आपल्या फलक लेखनातून वाचनाकडे वळवण्याचा प्रयत्न हे राजेंद्र सबनीस करत आहेत. आपल्याकडील संकलित केलेल्या हजारो सुविचारांचे ते गेली 16 वर्षे कोल्हापुरातील फलकांवर लेखन करतात.
राजेंद्र सबनीस हे खरंतर वयाच्या 68 व्या वर्षी देखील तरुणांनाही लाजवेल असा सुंदर उपक्रम राबवत आहेत. लोक त्यांना राजन नावाने देखील ओळखतात. राजन सबनीस मूळचे शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर गावचे आहेत. पण सध्या ते कोल्हापुरातील शिवाजी पेठ परिसरात स्थायिक आहेत. मलकापूर हायस्कूल शाळेत शिकताना राजन यांना वर्गातील फळ्यावर सुविचार लिहिण्याची आवड होती. त्यांचे अक्षर देखील अतिशय सुंदर होते.
तेव्हापासूनच त्यांनी वेगवेगळ्या सुविचारांचा संग्रह करण्याची सुरुवात केली होती. पुढे ते कोल्हापुरात 1981 साली विक्रीकर भवन, कोल्हापूर येथे टंकलेखक म्हणून नोकरीला लागले. या ठिकाणी देखील ते त्यांची आवड जोपासू लागले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर 2005 सालापासून त्यांनी कार्यालयातील फलकावर देखील लेखन करायला सुरुवात केली. तिथे लिहीलेला मजकूर वाचायला मोठमोठे अधिकारी मुद्दामहून यायचे. त्यावेळी लोकप्रतिनिधींनीही त्यांच्या या गोष्टीबद्दल सन्मान केला होता. पुढे 2007 साली त्यांना विक्रीकर निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. यावेळी देखील त्यांचे सुविचार लेखनाचे कार्य सुरूच होते.
Social Barber : आठवड्यातील एक दिवस गरजूंची सेवा करणारा मुंबईकर, अनेकांचा आहे आधार Video
2012 साली राजन सबनीस निवृत्त झाले. पण आपल्या आवडीमुळे त्यांना शांत बसवत नव्हते. त्यामुळे राजन यांनी आपल्या राहत्या घराच्या खालील फलक रोज लिहायला सुरुवात केली. येता-जाता बघणाऱ्या वाचकांच्याकडून या मुळे त्यांच्या परिसरात देखील फलक लेखन करण्याची मागणी होऊ लागली. त्यानुसार सध्या ते शिवाजी पेठेतील त्यांच्या घरासमोरील तरुण मंडळाच्या फलकावर, मंगळवार पेठ येथील एका फलकावर आणि अंबाबाई मंदिरातील एका फलकावर नियमितपणे सुविचारांचे लेखन करतात.
आजवर 7500 सुविचारांचे केले आहे लेखन
संग्रहित 10 हजार सुविचारांपैकी आत्तापर्यंत 7500 सुविचारांचे त्यांनी फलकांवर लेखन केले आहे. तर रोजच्या वाचनात ज्या काही चांगल्या गोष्टी येतील त्यापैकी निवडक गोष्टी ते लिहून ठेवतात. त्यामुळे राजन आजोबांच्याकडे असणारा सुविचारांचा संग्रह आजही वाढतच आहे.
कोल्हापुरात अनोखं फेस्टिवल, फूडसह घ्या सुरेल मैफलींचा आनंद, पाहा Video
सुविचार लेखनाचे नागरिकांकडून कौतुक
राजन सबनीस यांनी लिहिलेला सुविचार प्रत्येकजण येता-जाता वाचत असतो. रोजच्या घाई गडबडीत असे काही चांगले वाचायला भेटले की मनाला थोडे समाधान मिळते, अशी प्रतिक्रिया कित्येकांनी दिल्याचे सबनीस यांनी सांगितले. तर मी लिहिलेला सुविचार काही गृहिणी त्यांच्या वह्यांमध्ये देखील लिहून घेऊन संग्रहित करतात, असे देखील राजन आजोबांनी सांगितले.
एकूणच राजन सबनीस यांचा छंद समाज परिवर्तन घडवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणारा असा आहे. त्यामुळे त्यांच्या या फलक लेखनाचा छंद असाच सुरू राहो अशी भावना प्रत्येकजण व्यक्त करत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.