कोल्हापूर, 25 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावा दरम्यान 60 गाईंचा विष बाधा होऊन मृत्यू झाला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कणेरी मठावर झालेल्या कृत्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर जिवघेणा हल्ला करण्यात आला. या सगळ्यावर उत्सव समिती श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंथन मठ, कणेरी, कोल्हापूर यांच्याकडून खुलासा करण्यात आला आहे. याचबरोबर मारहाण झालेल्या पत्रकारांविषयी दिलगीरी ही व्यक्त करण्यात आली आहे.
काय म्हणाले मठ प्रशासन?
श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावा दरम्यान काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे आम्ही जीवापाड सांभाळ करत असताना अचानक काही गाईंचा झालेला मृत्यू हा मनाला वेदना देणारी बाब आहे.
हे ही वाचा : ब्रेकिंग! कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू
कणेरी मठाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हजारो गाईंचा सांभाळ केला जातो, त्यासाठी गोशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे. भाकड व भटक्या गाईना कोणी वाली नाही अशा जनावरांनाहि कणेरी मठ येथील गोशाळेत आणून त्यांचे पालन पोषण केले जाते. त्यामुळे ही गोशाळा देशभर आदर्शवत आहे. वर्षाला त्यावर काही कोटी रुपये खर्च केला जातो. तसेच लम्पीच्या साथीमध्ये हजारो जनावरांना मोफत औषधे देऊन त्यांचे प्राण मठाने वाचवले आहेत. भटक्या कुत्र्यांच्यासाठी ही नुकतीच निवारा व सेवा शाळा सुरु करण्यात आलेली आहे.
पर्यावरण रक्षणाबरोबरच जनावारावरील निष्टा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीच पंचमहाभूत लोकोत्सव साजरा केला जात आहे. यातूनच देशभरतील दुर्मिळ होत असलेल्या देशी प्रजातीच्या गाई, बैल, शेळी, अश्व, गाढव, मांजर यांचे प्रदर्शन आणि स्पर्धाहि घेतल्या जात आहेत. देशी प्रजाती टिकाव्यात हाच या महोत्सवाचा हेतू आहे.
अशा वेळी काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू मठाच्या दृष्टीने अतिशय वेदनादायीच आहे. कुणाच्या तरी अज्ञानांतून ही गोष्ट घडलेली आहे. ती नेमकी कशी घडली याबाबत वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल लवकरच बाहेर येईलच. कृपया झालेल्या घटनेबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये इतकीच विनंती आहे.
हे ही वाचा : कोल्हापूर : कणेरी मठात गाईंचा मृत्यू, वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण
मठाने नेहमी पत्रकार बांधवांचा सन्मान केला आहे, तसेच पत्रकार बांधवांनी हि नेहमी मठाच्या विविध सामाजिक उपक्रमात आपले बहुमुल्य योगदान दिले आहे व नेहमीच अमुल्य सहकार्य केलेले आहे व करत आहेत. तरी आज कोणी खोडसाळपणे पत्रकार बांधवांच्या बाबतीत गैरप्रकार केला त्याबद्दल आम्ही व्यवस्थापनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत आहोत.