कोल्हापूर, 1 मे : पुन्हा एकदा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मविआची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. आता तरी लोकांची खात्री पटली असेल की राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्लॅन केला होता, त्यात ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत असं केसरकर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले केसरकर? आता तरी लोकांची खात्री पटली असेल की राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्लॅन केला होता. त्यात ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. बाळासाहेबांच्या विचारावर आमचे मुख्यमंत्री चालत आहेत. हा राज्यात बदल घडला नसता तर युती पुन्हा आली नसती, आणि शिवसेना संपवण्याचा जो प्लॅन होता तो यशस्वी झाला असता, असं केसरकर यांनी म्हटलं आहे. बारसूवर प्रतिक्रिया दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी बारसू प्रकल्पावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकल्प व्हावा याची मागणी त्यांनी लेखी स्वरूपात केली होती. लोकांना संघर्ष करायला लावायचा याच्यातून राजकारण होत असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाही. हेच राजकारण समृद्धी महामार्गाच्या बाबतीत झालं. मेट्रो प्रकल्पाच्या बाबतीत झालं आहे. शेवटी जनतेनेच आता सज्ज झालं पाहिजे कारण हा विरोध राजकीय कारणातून केला जात असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. युतीवर प्रतिक्रिया राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत केसरकर यांना विचारले असता पुढील सर्व निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असं फडणवीस यांनी सुद्धा जाहीर केल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.