भुसावळ, 16 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात शेतातील एका घरात चार लहान अल्पवयीन मुलांचा हत्या करण्यात आली. या हत्याकांडाला आता नवं वळण लागलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पोलिसांच्या हवाल्यानं धक्कादायक खुलासा केला आहे. एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, हत्येतील एका 14 वर्षीय अल्पनयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. दरम्यान रावेर पोलीस मेडिकल रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत.
हेही वाचा..दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही, अजित पवारांनी दिली मोठी माहिती, म्हणाले...
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे बोरखेडा रस्त्यावरील शेतातील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची अज्ञातांनी हत्या केल्यानं महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात खळबळ उडाली. मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर एका शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमलीबाई भिलाला हे दांपत्य आपल्या मध्यप्रदेशातील मूळ गावी गेले असता घरात शेतातील घरात चार अल्पवयीन एकटे भावंडे होती. रात्रीच्या सुमारास या चारही भावंडांची अज्ञातांनी कुर्हाडी गळा चिरुन हत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
मृतांमध्ये दोन बहिणी आणि भावांचा समावेश आहे. मृत पीडित मुलगी (वय-14), रावल (वय- 11), अनिल (वय-08), सुमन (वय- 03) अशा भावंडांचा समावेश आहे.
महताब गुलाबचंद व रूमली बाई भीलाला हे आदिवासी दांपत्य गेले सात-आठ वर्षांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रातील रावेर जवळ असलेल्या केळीच्या बागेत सालदार म्हणून काम करत होते. या दांपत्याला 5 मुले होते. नातेवाईकाच्या दशक्रियेसाठी महताब गुलाबचंद व रूमलीबाई हे आपल्या मोठ्या मुलासह मध्यप्रदेशातील खरगोन येथे गेले होते. तिथे उशीर झाल्याने महताब गुलाबचंद व रूमलीबाई हे रात्री तिथेच थांबले. इकडे शेतातील घरी सईता, रावल,अनिल, सुमन ही अल्पवयीन चार भावंडे रात्री घरी एकटे होती.
शुक्रवारी सकाळी 8 वाजेला शेतमालक मुस्ताक हे शेतात आल्यावर सालदार महताबचे घराचे दार बंद दिसले. दार वाजवून घरातून कोणी प्रतिसाद न दिल्यानं अखेर मुस्ताक यांनी घरात डोकावून पाहिलं. घरात चारही भावंडे रक्ताच्या थारोळ्यात दिसली. शेतमालक मुस्ताक यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
एसआयटीची स्थापना..
रावेर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र इंगळे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार चिंथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे घटनास्थळी दाखल होवून तब्बल 7 तास घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरू होता. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक ( एसआयटी) स्थापना करण्यात आली आहेय. एसआयटीमध्ये पाच विशेष पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.
घटनास्थळी मृतांचे आई-वडील हे मुलांना अशा वस्तीत पाहून बेशुद्ध पडले. पोटाचे चार गोळ्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आई-वडिलांचे व परिवाराचे दुःख अनावर झाले होते. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी या घटनेचा निषेध केला असून घटनेतील दोषींना चोवीस तासांच्या आत अटक करा, अशी मागणी नातेवाईकांनी महाराष्ट्र सरकारकडे केली.
आदिवासी संघटनेनं दिला इशारा..
या घटनेत मृतांमध्ये एका बालिकेवर बलात्काराचा आरोप करत मध्यप्रदेश आदिवासी संघटनेने सदर घटनेत तात्काळ चौकशी करावी, अन्यथा महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात आदिवासी समाजातर्फे आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.
हेही वाचा...धक्कादायक! 'आरे'मध्ये अजूनही काही भागात सुरू होतं काम, झाडे तोडली
इन कॅमेरा शवविच्छेदन
या घटनेतील चारही मृतकांची इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार असून पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. मात्र एकाच परिवारातील चार अल्पवयीन भावंडांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे. दरम्यान या सर्व घटनेची माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी निंदा केली असून जळगाव जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अतिशय गंभीर असून त्याकडे पोलिसांनी आता अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.