जळगाव, 25 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करणे दुर्दैवी आहे. ज्याला कोणाला पाठराखण करायची असेल त्यांनी राज्यपालांची पाठराखण करा, पण कोश्यारींना महाराष्ट्रातून तातडीने हटवा. एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात राज्यपालांनी असं वक्तव्य करायला नको होतं. तर दुसरीकडे अमृता फडणवीस मात्र राज्यपालांची पाठराखण करतात. या राज्यात चालंय तरी काय? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर निशाणा
एकीकडे राज्यपालांनी असं बोलायला नको होतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मात्र अमृता फडणवीस राज्यपालांची पाठराखण करतात. या राज्यात चाललं तरी काय? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. तसेच ज्याला कुणाला पाठराखण करायची असेल त्यांनी करा पण कोश्यारींना तातडीने महाराष्ट्रातून हटवा अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे. कोश्यारींना महाराष्ट्रातून बाहेर पाठवण्याची वेळ आलेली असून, महाराष्ट्रातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असंही खडसे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मागणी वाढली; संतापलेल्या ग्रामस्थांनी वाचला पाढा...
अमृता फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. याबाबत अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. राज्यपालांचे मराठी भाषेवर प्रेम आहे. मराठी बोलण्याच्या ओघात कधीकधी वाद निर्माण होईल असं बोललं जातं असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Eknath khadse